अंधेरीचा गोखले पूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव सोमवारपासून बंद करण्यात आला.  या पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग तातडीने पाडून टाकावा अशी विनंती महापालिकेने पश्चिम रेल्वेला केली आहे. पूल न पाडल्यामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही असाही इशारा या पत्रात देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : सिलिंडर स्फोटात पाच जखमी

अंधेरीच्या गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असतानाच पुलाचा जुना भाग धोकादायक झाल्याचा अहवाल पालिकेच्या सल्लागाराने दिला. त्यामुळे पालिकेने वाहतूक विभागाच्या मदतीने पर्यायी मार्ग तयार करून सोमवारपासून पूल वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठीही बंद केला. सामान्यपणे रेल्वेवरील पुलाचे बांधकाम करताना रेल्वे रुळांवरील तुळई (गर्डर) टाकण्याचे व पाडण्याचे काम रेल्वेतर्फे केले जाते तर उताराचा भाग हा पालिकेतर्फे बांधला जातो. मात्र गोखले पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग बांधण्याची जबाबदारी रेल्वेने पालिकेकडे सोपवली आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग पाडून टाकण्यात यावा अशी विनंती पालिकेने रेल्वेला केली आहे. हा भाग पाडून टाकण्यासाठी रेल्वेला मेगा ब्लॉक घ्यावा लागू शकतो. पुलाच्या उताराच्या भागाचे काम आधीच सुरू असून रेल्वे रुळांवरील भागाच्या कामासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहे. रेल्वे रुळांवरील भाग लवकर पाडून टाकल्यास डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात करता येईल व पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी पुलाची एक बाजू खुली करता येईल असे पालिकेचे नियोजन आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc letter to western railway ask to demolish andheri gokhale bridge mumbai print news zws