मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैराणी मार्गावर गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॉलीतील सहा भाविकांना विजेचा धक्का बसला. त्यात एकाचा मृत्यू झाला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. तसेच, या दुर्घटनेतील मृत व जखमींच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत पुरवावी, अशीही मागणी गणेशोत्सव समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
साकीनाका येथील खैराणी मार्गाकरून दरवर्षीप्रमाणे श्री गजानन मित्र मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. त्यावेळी उच्च दाबाच्या वीजेच्या तारांचा ट्रॉलीला स्पर्श झाला. शनिवारी मध्यरात्री दुर्घटना घडली. दुर्घटनेत बिनू शिवकुमार (३६) यांचा मृत्यू झाला. तसेच, पाच जण गंभीर जखमी झाले. तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयाल उपचार सुरू आहेत. घडलेली घटना दुर्दैवी असून त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत गणेशोत्सव समितीने व्यक्त केले आहे.
विसर्जन मार्गावर उच्च दाबाच्या वीजेच्या तारा असल्यास तिथे खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. या घटनेची महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलीस, बेस्ट, टाटा पॉवर, महावितरण आणि इतर यंत्रणांसोबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. खैराणी मार्गावर घडलेली घटना दुर्दैवी असून यात मृत तरुणाच्या वारसांना आणि जखमींना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने उत्सवापूर्वीच मुंबईत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक मंडळांना विदयुत रोषणाई आणि मंडप सजावटीचे काम करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचीत केले होते. त्यानुसार मंडळांनीही काळजी घेऊन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे संपूर्ण उत्सवात काही अनूचित प्रकार घडला नाही.
सार्वजनिक उत्सवात अशा प्रकारच्या दुर्देवी घटना घडू नयेत, यासाठी मुंबई आणि उपनगरातील विसर्जन स्थळांच्या मार्गावरील उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण करावे, जेणेकरुन आगामी नवरात्रोत्सवात अशा प्रकराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाहीत, असेही समितीने पत्रात नमूद केले आहे.