मुंबई : पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले असले तरी या प्रकल्पाला अद्याप परवानगीची प्रतीक्षा आहे. वन्यजीव विभागाची राज्याची परवानगी मिळाली असून केंद्राची परवानगी बाकी आहे. तसेच वन विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नाही.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतून मुंबईला दर दिवशी ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मुंबईची लोकसंख्या वाढत असून पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा हे तीन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या प्रकल्पांचे काम रखडले आहे.
गारगाई धरणासाठी लाखो झाडे कापावी लागणार असल्यामुळे हा प्रकल्प पालिका प्रशासनाने बाजूला ठेवला होता. मात्र मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. त्यातच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे.
परवानग्यासाठी हा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पामुळे तानसा अभयारण्य बाधित होणार असून त्याकरिता वन्यजीव विभागाची परवानगी लागणार आहे. तसेच वन विभागाचीही परवानगी लागणार आहे. या परवानग्यांसाठी २०२० मध्ये अर्ज करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत वन्यजीव विभागाची राज्याची परवानगी मिळाली असून केंद्राची परवानगी बाकी आहे. तर वन विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नाही, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या सात धरणातील पाणीसाठ्यावर भिस्त आहे. सगळी धरणे कठोकाठ भरली असली तरी सलग तीन वर्षे मुंबईकरांवर पावसाळ्याच्या आधी पाणी कपात लागू करण्याची वेळ येते किंवा राखीव साठा वापरावा लागतो. त्यामुळे पालिकेने गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.प्रकल्पासाठी परवानग्या मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे चार वर्षे लागणार आहेत. या प्रकल्पासाठी ३१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून परवानग्या रखडल्यामुळे हा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
मागणी आणि पुरवठ्यात तूट
मुंबईत सध्या दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. प्रत्यक्षात आता मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज ४६०० दशलक्ष लिटर इतकी आहे. गरगाई धरण झाल्यास ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
येत्या काळात मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढणार आहे. २०४१ पर्यंत मुंबईकरांच्या पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लिटर इतकी होणार आहे. मात्र सध्या तरी सात धरणांव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा होत असला तरी तो दिवसेंदिवस कमी पडू लागला आहे.