केंद्रात होऊ घातलेले सत्तांतर लक्षात घेत केंद्र सरकारात मोक्याच्या-महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती मिळावी यासाठी सरकारी बाबूंनी भाजप-सेना नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. सत्तांतराच्या चाहुलीनंतर निष्ठेच्या टोप्या फिरवणाऱ्या या बाबूंनी महिनाभरापासूनच या कसरतीला सुरुवात केली आहे, हे विशेष. केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार जाणार हे निश्चित होताच पंतप्रधान कार्यालयातील काही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी आपली बदली परदेशांमध्ये उच्चायुक्त किंवा तत्सम पदांवर करून घेतली आहे. सुमारे पाच अधिकाऱ्यांनी आपली नियुक्ती परदेशात करून घेतली आहे. तर नवीन सरकारात आपली नियुक्ती सत्तेच्या निकट म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात व्हावी यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी दिल्लीत प्रभाव असलेल्या भाजप-सेना नेत्यांकडे चकरा मारायला सुरुवात केली आहे.  राज्यातील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वावगे काहीच नाही
मोदींनी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय असो की अन्य महत्त्वाच्या नियुक्त्या, त्यात गुणवत्तेचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याने भाजप अथवा सेनेच्या नेत्याशी संपर्क साधला तर त्यात फारसे वावगे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करत एका ज्येष्ठ शिवसेनानेत्याने सरकारी बाबूंच्या प्रयत्नांचे समर्थन केले. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असली तरी राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने पालिकेत येणारे सनदी अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे एक डोळा ठेवूनच पालिकेचा कारभार करतात, अशी टीका सेना नेत्यांकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. आता सत्ताबदलाच्या पाश्र्वभूमीवर आपली गाडी ‘साईडिंग’ला लागू नये, यासाठी काही अधिकारी ‘काळजी’ घेताना दिसतात ते स्वाभाविक असल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले.

वागणुकीतही फरक
केंद्रानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही सत्तांतर होऊ शकतो हे लक्षात घेत अनेक अधिकाऱ्यांच्या वागणुकीतही फरक दिसू लागल्याचे लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या एका भाजप उमेदवाराने सांगितले. सत्ताबदलानंतर आपण दूर फेकले जाऊ नये यासाठी कोणी सेनानेत्यांच्या संपर्कात आहे तर कोणी भाजपनेत्यांशी सलगी करू पाहात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्र व राज्यात काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत असल्याने कार्यपद्धतीपासून सर्वच गोष्टींत समन्वय साधताना अडचण येत नाही. सत्तांतर होणार हे लक्षात घेऊन येणाऱ्या सरकारमध्ये जबाबदारीचे पद मिळावे असे वाटण्यात काहीही चूक नाही.    
– एक ज्येष्ठ सनदी अधिकारी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government employee creating good relation with opposition leaders