मुंबई : आयआयटी मुंबईच्या मागील बाजूस ‘भानशीला पाडा’ असून तेथे पिढ्यांपासून आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. अतिक्रमण केल्याचा दावा करीत आयआयटी मुंबईने या पाड्याला नोटीस बजावली. यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. आयआयटी मुंबईच्या मागील बाजूस भानशीला पाडा असून गेली अनेक वर्षे या पाड्यामध्ये आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. भानशीला पाड्यात अतिक्रमण करण्यात आल्याचे दावा करीत आयआयटी मुंबईने येथील रहिवाशांना नोटीस बजाववली आहे. मात्र, आम्ही येथे पिढ्यानपिढ्या राहत असूनही अतिक्रमण केले असे कसे म्हणता येईल असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. रहिवाशांकडे जमिनीची कागदपत्रे, मतदान ओळखपत्र आणि अन्य सरकारी कागदपत्रांचे पुरावे आहेत. तरीही पाड्यातील रहिवाशांवर नोटीस बजावण्यात आली आहे, असे ‘सेव्ह आरे’च्या अमरिता भट्टाचार्य यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत. आदिवासी पाडे केवळ वास्तव्यासाठी नाही, तर जैवविविधतेच्या रक्षणासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांना विस्थापित करणे अन्यायकारक आहे, असेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्यात येईल, वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला.
२०१३ मध्ये सर्वेक्षण
आयआयटी मुंबईकडून भानशीला पाड्याचे २०१३ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षण कशासाठी करण्यात येत आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यानंतर आता आयआयटी मुंबईने ही नोटीस पाठवली आहे.
आरे प्रशासनाकडून आदिवासींची दुकाने, टपऱ्यांवर कारवाई
काही दिवसांपूर्वी आरे दुग्ध वसाहत परिसरातील रस्त्यालगत असलेली छोटी दुकाने, टपऱ्यांवर आरे दुग्ध वसाहत प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला होता. मयूर नगर, जीवाचा पाडा या ठिकाणी कारवाईची नोटीस लावण्यात आली होती. त्यानंतर लगेचच मयूर नगर, जीवाचा पाडा येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत तेथील स्थानिक आदिवासींची रस्त्यालगत असलेली दुकाने, टपऱ्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी काही महिलांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
आदिवासींचे आंदोलन
आरेमधील २७ आदिवासी पाड्यांतील आदिवासींना हक्काच्या जमिनीवरून दुसरीकडे हलवण्याच्या विरोधात आरेमध्ये यापूर्वीही आंदलने करण्यात आली आहेत. मागील अनेक वर्षांपासून आदिवासींना त्यांच्या मूळ जमिनीवरून विस्थापित करण्याच्या योजना आखल्या जात असल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.