लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, किल्ल्यांवर जाणे आता आणखी सोयीचे होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ विशेष भारत गौरव सर्किट यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव सर्किट यात्रे’तून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमीचे दर्शन घडणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालवण्यात येणार आहे. यासाठी विशेष पर्यटन ट्रेन पॅकेज सुरू करण्यात आले आहे. भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) पर्यटन ट्रेन चालविण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि काळातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे परस्परांना जोडण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. भारत गौरव सर्किट यात्रेद्वारे ही ठिकाणे एकमेकांशी जोडली जातील, अशी घोषणा रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित किल्ले, राजवाडे, युद्धभूमी अशी अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. विशेष भारत गौरव सर्किट यात्रेमुळे प्रवाशांना, विशेषतः तरुणांना या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळेल आणि समृद्ध मराठा इतिहासाचा भाग असलेल्या या ठिकाणांना भेट देण्याची आणि जवळून बघण्याची संधी मिळेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आयआरसीटीसीने याआधी ‘भारत गौरव सर्किट यात्रे’द्वारे पर्यटकांना देशातील विविध ठिकाणांचे दर्शन घडवले आहे. पर्यटकांसाठी विशेष टूर ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. आयआरसीटीसी टूर दरम्यान पर्यटकांना सुरक्षित आणि निरोगी प्रवास घडवून आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात येणार आहेत. तसेच धर्मशाळा किंवा हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, चहा / कॉफी आणि रात्रीचे जेवण याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात येते. आयआरसीटीसीने आकर्षक किंमतीत सर्व समावेशक पॅकेजेस उपलब्ध असतात. तसेच पर्यटकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

पुण्याच्या रेल्वेगाड्यांच्या मागणीबद्दल रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले काय म्हणाले ?

पुणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक आणि तंत्रज्ञान केंद्र आहे. महाराष्ट्राला देशाच्या इतर भागांशी जोडणारे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात येत आहे. पुणे स्थानक आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांच्या विकासाचे मोठे काम जलदगतीने सुरू आहे. याशिवाय, पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेले उरुळी टर्मिनस म्हणून विकसित केले जात आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांचा भार आणि पुणे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी होईल. त्याचप्रमाणे हडपसर आणि शिवाजी नगरसारखी स्थानके देखील ‘सॅटेलाइट टर्मिनस स्टेशन’ म्हणून विकसित केली जात आहेत. यामुळे पुणे स्थानकाची क्षमता वाढेल आणि पुण्याहून येणाऱ्या -/जाणाऱ्या गाड्या वाढतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways bharat gaurav circuit yatra gives tourists chance to see forts and battlefields mumbai print news mrj