मुंबई : मुंबईतील तापमानात सातत्याने चढ – उतार होत आहे. मागील दोन – तीन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता मात्र, मुंबईत शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमानात वाढ होण्याची शक्यता नसली तरी उकाड्यामुळे बैचन होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा ताप, तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३३.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या मुंबईत सकाळी सात – साडेसातपासून अगदी सायंकाळपर्यंत अंगाची लाही लाही होत आहे.

उकाड्यापासून सुटका होणे दूरच, उलट तो कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, मागील काही दिवस पावसाळी वातावरणामुळे मुंबई, ठाणे परिसरात तीव्र उकाडा जाणवत आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे.

कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. या असह्य उकाड्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडत असून सर्दी, ताप, डोकेदुखी याखेरीज डोळे कोरडे होणे, पोटदुखी असा त्रास होत आहेत. तापमानाच्या पाऱ्यात फारशी वाढ होणार नसली, तरी सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज आहे.

विदर्भात गारपिटीचा इशारा कायम

राज्यातील काही भागात उकाड्यामुळे नागरिक हैराण असतानाच विदर्भात गारपिटीचा इशारा कायम आहे. विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारेही वाहतील.

कोकणात उष्ण व दमट वातावरण

मागील दोन – तीन दिवसांपासून कोकणातील अनेक भागात पाऊस कोसळला. शविवारपासून मात्र, या भागात उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

एप्रिल महिन्यात तापमानवाढ होण्याची शक्यता

यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

एप्रिलमध्ये उष्ण लाटा आणि पाऊस

राज्यासह देशाच्या बहुतांश भागात एप्रिल महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. यामध्ये सलग २ ते ५ दिवसांच्या कालावधीत उष्ण लाटा अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे. गुजरात तसेच पूर्व किनारपट्टी आणि पूर्व भारतातही उष्ण लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intense heat to face by mumbaikars for a few more days mumbai print news zws