मुंबई : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूकीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘सायबर शास्त्रा’चे धडे देणे विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बंधनकारक केले आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना नव्या शैक्षणिक वर्षामध्ये दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आयोगाकडून विशेष माहितीपुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे.
स्मार्टफोन, लॅपटॉप, समाज माध्यमे या सध्याच्या तरुणांसाठी आवश्यक बाबी ठरल्या आहेत. पण या डिजिटल माध्यमांच्या अतिवापराबरोबरच हॅकिंग, फसवणूक, डेटा चोऱ्या असे सायबर गुन्हेही दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गृहविषयक संसदीय स्थायी समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात याच धोक्यांची नोंद करून उच्च शिक्षण संस्थांमध्ये सायबर शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच ऑनलाइन शिस्त अंगीकारली तर भविष्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक संकटे टाळता येतील. त्यासाठी ‘सायबर सुरक्षित कॅम्पस निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
ही बाब लक्षात घेऊन आयोगाने ‘उच्चशिक्षण संस्थांसाठी निरोगी सायबर वातावरणाची माहितीपुस्तिका’ नावाची मार्गदर्शिका ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. या माहितीपुस्तिकेत डिजिटल सेफ्टी, डेटा प्रायव्हसी, जबाबदार ऑनलाईन वर्तन आणि सायबर-जागरुकतेबाबत सविस्तर मार्गदर्शन आहे. तांत्रिक अभ्यासक्रमांशिवाय इतर सर्व अभ्यासक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे प्राथमिक धडे देण्याचे आयोगाकडून अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रत्येक शिक्षणसंस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि समाज माध्यमावर या पुस्तिकेचा प्रचार केला जाईल. तसेच दीक्षांत समारंभावेळी नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सायबर सुरक्षा सत्र घेण्याचे आदेशही यूजीसीने दिले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व बिगरशिक्षक कर्मचाऱ्यांनीही हे वाचून प्रत्यक्ष वापरात आणावे, अशा सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना ही माहितीपुस्तिका ई-मेलद्वारे पोहोचवण्यात येणार आहे.
नव्या पिढीच्या ‘डिजिटल हॅबिट्स’मध्ये सुरक्षिततेचा धागा गुंफण्यासाठी यूजीसीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. मोबाईल ॲप्स, ई-मेल्सपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व स्तरांवर हॅकिंग आणि डेटा चोरीचे प्रकार वाढत असल्याने ‘सायबर सुरक्षे’चे धडे हा केवळ अभ्यासक्रमाचा भाग नसून जीवनशैलीचे अंग ठरणार आहे. सायबर सुरक्षेची सवय ही केवळ वैयक्तिक सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आवश्यक ठरणार असल्याचे यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.