मुंबई : पक्षांच्या धडकेमुळे हवाई वाहतुकीला होणारा धोका कमी करण्यासाठी महापालिकेने येत्या पंधरा दिवसात वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण करुन त्याला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करावे. तसेच विमानतळाच्या परिसरातील कचरा संकलन केंद्र व क्षेपण भूमीवर पक्षी येऊ नयेत, यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक तज्ज्ञ तसेच तरुण अभ्यासकांकडून नव्या संकल्पना जाणून घेण्यात याव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी येथे दिले.
मुंबई विमानतळ परिसरात पक्षांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, मुंबई अग्निशमन दल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात कचरा क्षेपणभूमी, कांदळवन अथवा वनक्षेत्र यामुळे पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे विमान वाहतुकीला धोका निर्माण होत असतो. विमानाला पक्षी धडकण्याच्या २०२० मध्ये २० घटना घडल्या असून २०२१ मध्ये ३५, २०२२ मध्ये ३६, २०२३ मध्ये ६०, २०२४ मध्ये ५९ तर जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत १९ घटनांची नोंद झाली आहे. ठाणे खाडी परिसरात येणाऱ्या परदेशी पक्षांमध्येही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असून २०१५ मध्ये १० हजार फ्लेमिंगो आले होते. हीसंख्या वाढली असून २०२४ मध्ये दोन लाख फ्लेमिंगोंची नोंद झाली आहे.
मुंबईतील देवनार, कांजूरमार्ग डंम्पिंग ग्राऊंड आणि वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र हे विमानतळाच्या फनेल झोन मध्ये येतात. कचराभूमीत खाद्य मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षांचा वावर असतो. त्यामुळे विमानतळावर उतरणाऱ्या व येथून उड्डाण करणाऱ्या विमानांना धोका पोहचतो. ही समस्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.
यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, पक्षांना रोखण्यासाठीचे कोणतेही तंत्रज्ञान सध्या पालिककडे उपलब्ध नाही. एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कचऱ्याची विल्हेवाट लवकर लावण्याबाबत महापालिका विचार करीत आहे. . त्यावर यासंदर्भात उपाययोजना शोधण्यासाठी शास्त्रज्ञ, उद्योजक, तरुण अभ्यासक, स्टार्टअप यांना आवाहन करुन नवसंकल्पना मागवाव्यात आणि हॅकेथॉन आयोजित करावी, अशा सूचना शेलार यांनी दिल्या. नवीन संकल्पनांचा अभ्यास पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मदत घेऊन करण्यात यावा आणि अहवाल सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.