मुंबई : मुंबईकरांचे जीवनमान अधिक सुसह्य करण्याच्या दृष्टीने भविष्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपायांवर ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई @ २०४७’ या परिषदेत मंत्री व वरिष्ठ अधिकारी भूमिका मांडणार आहेत. मुंबईत वाहतूक, घरबांधणी, रस्त्यांचा विकास, पायाभूत सुविधा हे विषय गंभीर आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. यावर मुंबई @ २०४७ परिषदेत उहापोह करण्यात येणार आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेच्या कायापालटाबरोबरच आता मेट्रो रेल्वेसेवेचे जाळे, बुलेट ट्रेन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरासाठी अनेक विकास प्रकल्प शहरात साकारले जात आहेत. झोपडपट्टीवासीयांच्या स्वप्नातील हक्काच्या घरांचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. महामुंबईच्या विकासाचे संकल्प चित्र कसे असेल, याविषयी राजकीय नेतृत्व आणि शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांकडून परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे. मुंबईच्या भविष्यातील विकासावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे मनोगत व्यक्त करतील. कौशल्य विकासाच्या संधीवर कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा हे विचार मांडणार आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त डॅा. संजय मुखर्जी हे मुंबई व महानगरांचा विकास, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था, म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल हे मुंबईतील घरबांधणी क्षेत्र व परवडणारी घरे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चौथी मुंबई, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर हे आपत्ती व्यवस्थापन व नगरनियोजनाचे आव्हान याचा वेध घेणार आहेत.