मुंबई– दहीहंडीचा सराव सुरू असताना ६ व्या थरावरून कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. तो अल्पवयीन गोविंदा नवतरुण मित्र मंडळ पथकाचा सदस्य होता. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गाण्यांचे सूर कानी पडू लागले आहेत. १६ ऑगस्ट होणार्या दहीहंडी उत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करून वर्चस्वाची हंडी फोडण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उंच थर रचण्याची स्पर्धा वाढू लागली आहे. मात्र या उंच थराच्या स्पर्धेत एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
६ व्या थरावरून कोसळला
दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव (११) या चिमुकल्या गोविंदाचा समावेश होता. या पथकाने ६ थर लावले होते. चिमुकला महेश ६ व्या थरावर चढला होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास तो ६ व्या थरावरून कोसळला आणि त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
याप्रकरणी आयोजक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दहिसर पोलिसांनी दिली. सराव करताना मंडळाने सुरक्षेचे उपाययोजना करणे आवश्यक होेते. मात्र ते केलेले दिसून आले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.