मुंबई : नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागांचा शोध घेतला जाईल. तसेच, याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.

मुंबईतील कबुतरखान्यांचा पर्युषण काळादरम्यान थंड झालेला वाद दादरमधील जैन मुनींच्या धर्म सभेनंतर पुन्हा तापला आहे. कबुतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, यासाठी जैन समाजाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुंबई जैन संघ संगठनचे नितीन व्होरा, मुकेश जैन, अतुल शहा, विजय जैन, अध्यात्म परिवाराचे हितेश मोटा यांचे शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी भूषण गगराणी यांची महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली.

मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये कबुतरांना दाणे पुरवता येतील, अशा पर्यायी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भूषण गगराणी यांच्याकडे केली. दरम्यान, नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. कबुतरखान्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्याने पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.

मुंबईत ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती व सूचना मागविण्याची कार्यवाही देखील महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वी केली आहे. त्यानंतर आता जैन समाजाच्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल.