मुंबई : मुंबईच्या विकासाच्या संदर्भात ‘ लोकसत्ता ’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई @ २०४७’ या परिषदेत अनेक मान्यवरांकडून येत्या गुरुवारी विचार मांडण्यात येणार आहेत.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेच्या कायापालटाबरोबरच आता मेट्रो रेल्वेसेवेचे जाळे, बुलेट ट्रेन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरासाठी अनेक विकास प्रकल्प शहरात साकारले जात आहेत. झोपडपट्टीवासीयांच्या स्वप्नातील हक्काच्या घरांचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. आपल्या महामुंबईच्या विकासाचे संकल्प चित्र कसे असेल, याविषयी राजकीय नेतृत्व आणि शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांकडून परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवर आणि विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख या परिषदेत आपले विचार व्यक्त करणार आहेत. तसेच मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती हे भूमिका मांडतील.
सहभागाची संधी
या परिषदेत निमंत्रितांखेरीज निवडक व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी ईमेलद्वारे नोंदणी करावी लागेल. संबंधितांनी eventloksatta@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.