मुंबई : प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे महाविद्यालयांनी विहित मुदतीत जमा न केल्याने शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षात ९७ हजार २३३ विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. आता पुढील १ महिन्यात विहित शुल्कासह कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर न करणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील. तसेच या महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास परवानगी नाकारण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्रे सादर न केलेल्या महाविद्यालयांची यादी मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणीबाबतची आवश्यक कागदपत्रे येत्या ८ दिवसांत विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. मात्र ही मुदत संपल्यानंतरही ज्या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्रे सादर केन करणाऱ्या महाविद्यालयांची यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीत नामांकित महाविद्यालयांचाही समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांना पुन्हा एकदा १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांची असेल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा

प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे विहित मुदतीत जमा करण्यासाठी सर्व संलग्नित महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे मुंबई विद्यापीठामार्फत कळविण्यात येते. मात्र त्याकडे महाविद्यालयांकडून सर्रास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले जातात. परिणामी, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरीची संधी मिळवताना बहुसंख्य अडचणींचा सामना करावा लागतो.

हेही वाचा : म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

हजारो विद्यार्थ्यांची कागदपत्रे प्रलंबित

(वर्षनिहाय आकडेवारी)

शैक्षणिक वर्ष – विद्यार्थी संख्या

२०१९-२० – १४ हजार ४४२

२०२०-२१ – १२ हजार २८१

२०२१-२२ – २२ हजार ९००

२०२२-२३ – ४७ हजार ६१०

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university admission of 97 thousand students in danger mumbai print news css