मुंबई : पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईतील तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. मात्र यासोबतच आर्द्रतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे. गेले काही दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या मुंबईत उकाडा आणि काही प्रमाणात उन्हाचा सामना करावा लागत आहे.
आता पुढील तीन – चार दिवस आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवेल, आणि विशेषतः सकाळी व संध्याकाळी अधिक घाम येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबईच्या तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईकर बुधवारीही घामाच्या धारांनी हैराण झाले होते. दरम्यान, पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. याचबरोबर तापमानातही मागील दोन – तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मध्येच ढगाळ वातावरण, तर मध्येच उन्हाचा ताप यामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. मुंबईत साधारण सोमवारपासून ही स्थिती आहे. तापमानात सोमवारीही वाढ झाली होती. त्यानंतर बुधवारीही परिस्थिती सारखीच होती. सकाळी ११ नंतर कडक ऊन पडले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३०.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१ अंश सेल्सिअस कमाल तापामनाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात पश्चिमेकडून येणारे वारे वेगवान असतात. त्यामुळे वातावरणात गारवा असतो. मात्र, सध्या मोसमी पावसाने उघडीप दिल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. परिणामी, उष्ण व दमट वातावरणामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे.
आर्द्रतेचे प्रमाण अधिक
समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मुंबईकर करीत आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
पावसाची विश्रांती
मुंबईत पुढील तान – चार दिवस फारसा पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे साधारण हा आठवडाभर तरी मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. रविवारनंतर पाऊस सुरू होईल. मात्र, पावसाचा जोर फारसा नसेल हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.