मुंबई : उपनगरी रेल्वे स्थानकांतील सरकत्या जिन्यांमुळे वृद्ध, गरोदर महिला आणि इतर प्रवाशांचा प्रवास सोयीचा झाला आहे. परंतु, शहर आणि उपनगरांतील विविध रेल्वे स्थानकांतील सरकते जिने वारंवार बंद पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही प्रवासी अकारण ‘आपत्कालीन कळ’ दाबत असल्यामुळे सरकते बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे.
वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात. अशा वेळी धावत्या रेल्वेगाडीची धडक लागून अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर ‘शून्य मृत्यू मोहिमे’अंतर्गत पादचारी पूल, सरकते जिने, उद्वाहनांची संख्या वाढवण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात १२० हून अधिक सरकते जिने आहेत. सर्वाधिक सरकते जिने बोरिवली स्थानकात आहेत. या स्थानकात एकूण ११ सरकते जिने आहेत. तर, पश्चिम रेल्वेवरील टर्मिनसपैकी वांद्रे टर्मिनसवर सर्वाधिक सहा सरकते जिने आहेत.
पश्चिम रेल्वे स्थानकांवर बसवलेले १२० हून अधिक सरकते जिने दररोज सरासरी ६ ते ७ वेळा बंद पडतात आणि यापैकी सुमारे ५ ते ६ सरकते जिने बंद पडण्याच्या घटना आपत्कालीन थांबा बटणाचा गैरवापर केल्याने होतात. काही प्रवासी विनाकारण आपत्कालीन थांबा बटन दाबत असल्यामुळे सुमारे ९० ते ९५ टक्के सरकते जिने बंद पडतात. तसेच काही प्रवासी चप्पल, चाव्या आणि कापडाचे तुकडे यंत्रसामग्रीत फेकतात. हँडरेलिंगचे नुकसान करतात. याचा त्रास इतर प्रवाशांना सहन करावा लागतो. तर, दुरुस्ती तांत्रिक बिघाडामुळे सरकते जिने बंद पडण्यामागे केवळ ५ ते १० टक्के आहे.
भविष्यात किती जिने ?
● पश्चिम रेल्वेवर २०२४-२५ मध्ये ५ सरकते जिने उभारण्यात आले आहेत. यापैकी भाईंदर रेल्वे स्थानकात दोन, तर कांदिवली, राम मंदिर, मीरा रोड या रेल्वे स्थानकांमध्ये प्रत्येकी एक सरकता जिना उभारण्यात आला आहे.
● २०२५-२६ मध्ये विविध स्थानकांमध्ये १२ सरकते जिने उभारण्याचे नियोजन आहे. यापैकी ९ सरकते जिने उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. माहीम, राम मंदिर, नालासोपारा या दोन स्थानकांत प्रत्येकी दोन आणि मरिन लाइन्स, माटुंगा रोड, नायगाव या स्थानकांत प्रत्येकी एक सरकता जिना उभारण्यात येईल.
सुरू होण्यास किती वेळ?
सरकता जिना बंद पडल्यानंतर त्याचे निरीक्षण करून तो पुन्हा सुरू करण्यासाठी ४८ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सरकता जिना बंद होताच संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर संदेश मिळतो आणि ते तात्काळ संबंधित सरकत्या जिन्याकडे पोहोचतात. सरकत्या जिन्याच्या स्थितीचे निरीक्षण अंधेरी स्थानकातील केंद्रीकृत नियंत्रण कक्षातून वेब मॉनिटरिंग सिस्टमद्वारे केले जाते आणि विभागातील ऑपरेटरलाही मोबाइल अॅपद्वारे माहिती मिळते. ऑपरेटर २० ते ३० मिनिटांच्या आत सरकता जिना सुरू करतात. यादरम्यान सरकत्या जिन्याचा वापर करता येत नाही.
रोखायचे कसे?
काही प्रवासी खोडसाळपणा करीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्थानकात गर्दी असताना खोडसाळपणा करणाऱ्या प्रवाशांना पकडणे शक्य होत नाही. सरकते जिने पुन्हा सुरू करणे हे एक सततचे काम बनले आहे. मात्र काही प्रवाशांच्या चुकीच्या कृतीमुळे अन्य प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांवरही ताण येतो. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd