मुंबई : कोल्हापूर-हुबळी आणि कोल्हापूर-सोलापूर या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांसाठी मिरज येथे नवी कॉर्ड लाईन (रेल्वेमार्गावर एका मुख्य मार्गाला जोडलेली दुसरी छोटी रेल्वे मार्गिका) प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वे अंतर्गत १२८.७८ कोटी रुपये खर्चाच्या १.७३ किमी मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी दिली.

बहुमार्गिका, उड्डाणपूल, बायपास मार्गिकेची क्षमता वाढविण्याअंतर्गत प्रस्तावित उपक्रमाचे उद्दिष्ट मिरज जंक्शनवरील रेल्वे वाहतूक सुरळीत करणे आहे. मिरज – पुणे, मिरज – कोल्हापूर, मिरज – पंढरपूर आणि मिरज – लोंढासारख्या मार्गांना जोडणारा हा एक प्रमुख मार्ग आहे. सध्या कुर्डुवाडी किंवा हुबळी येथून येणारे आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सरासरी १२० मिनिटे मिरज येथे अडकतात. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे परिचालन विलंबाचा प्रश्न सुटू शकेल.

पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रदेशात मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांचे कार्यक्षमतेने संचालन करण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे प्रवाशांची मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासाची दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण होणार आहे, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे व्यक्त करण्यात आला.

कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद दिशाभूमी एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना या कॉर्ड मार्गिकेचा फायदा होईल. यासह कोल्हापूर-हुबळी, कोल्हापूर-सोलापूर या मार्गावर ये-जा करणार्या मालगाड्यांनाही याचा मोठा फायदा होईल.

मिरजेतून बेळगाव आणि सोलापूर आणि कोल्हापूरकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा तीस मिनिटे वेळ वाचतील. याशिवाय बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर येथून धावणाऱ्या मालगाड्या थेट कॉर्ड लाईन स्टेशनवरून कमी वेळेत मालांची वाहतूक पूर्ण होईल.

मिरज जंक्शनमधून कोल्हापूरसाठी एक, बेळगाव, हुबळीमार्गे पुढे जाणारा एक, तर सोलापूरकडे जाणारा एक असे तीन मार्ग एका बाजूने, तर सातारा-पुणेच्या दिशेने एक मार्ग जातो. कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूरकडे जाणार्या तसेच बेळगाव, हुबळीमार्गे पुढे तिरुपती, हैदराबादकडे जाणार्या रेल्वेगाड्या मिरज जंक्शनमधून जातात. येता-जाता या गाडीचे इंजिन बदलून विरुद्ध बाजूला लावावे लागते. यामुळे मिरज जंक्शनवर या गाड्या सुमारे ३० ते ४० मिनिटे थांबतात. कॉर्ड मार्गिकेमुळे वेळेचा अपव्यय होणे बंद होणार आहे.