मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतही काही भागात मागील दोन दिवसांपासून हलक्या सरी बरसल्या‌. दरम्यान, मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा फारसा जोर नव्हता. काही ठराविक भागात हलक्या सरी बरसल्या. मात्र, मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारण गुरुवारपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील. सायंकाळनंतर अनेक भागात जोरदार पाऊस पडेल. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

आज पावसाचा इशारा कुठे

वादळी वाऱ्यासह पावसाचा सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट)

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

सिंधुदुर्ग, अहिल्या नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर , लातूर आणि धाराशिव

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भाग आणि बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी वाऱ्यांनी सोमवारी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या काही भागात प्रगती केली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आतापर्यंत श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात वाटचाल केली. मालदीव आणि कोमोरिनच्या काही भागात मोसमी वारे पुढे सरकले. तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीलगत बुधवारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात वळिवाच्या पावसाचा तडाखा

राज्यातील काही भागात वळिवाच्या पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे काही प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. सकाळी ११ ते १२ पर्यंत उन्हाचा ताप आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे वातावरण अनेक भागात आहे.