मुंबई : कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानाचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेले काही दिवस पाऊस पडलेला नाही. परिणामी तेथील तापमानात वाढ झालेली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्याचबरोबर विदर्भापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

पुढील चार ते पाच दिवस कोकणातील तसेच मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच या कालावधीत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, अहिल्यानगर , सातारा , सांगली सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतर भागात हलक्या सरींची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी मुसळधार पाऊस कोसळला त्यानंतर रविवारी मात्र पावसाने उघडीप दिली. संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडलेला नाही. दरम्यान, राज्यात ब्रम्हपुरी येथे रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

मोसमी वारे स्थिरावलेलेच

मागील ११ दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा रविवारीही अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट पर्यंत मोसमी वाऱ्यांची सीमा रविवारीही कायम होती. मोसमी वारे अजूनही कमजोर असल्याने मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीस वाट पहावी लागणार आहे.