मुंबई : गेल्या आठवड्यापासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर कमी होऊ लागला असून मुंबईतील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. येत्या पाच दिवसांमध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत जून महिन्यात खूप कमी पाऊस पडला. त्यामुळे मुंबईत पावसाची तूट होती. ही तूट जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसात भरून निघाली असून सरासरीपेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्यानंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्यास सुरूवात झाली. आता पावसाचा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईत अधूनमधून पावसाची एखादी सर कोसळत असून कडक उन पडू लागले आहे. परिणामी, तापमानात खूप वाढ झाली आहे. तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील काही भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. येत्या पाच दिवसासाठी अशीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (गेल्या २४ तासांत) सांताक्रूझ केंद्रात ११.६ मि.मी. आणि कुलाबा केंद्रात ७.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात कमाल ३०.६ सेल्सिअस आणि किमान २५ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात कमाल ३० सेल्सिअस आणि किमान २५ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेले दहा दिवस कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत काहीशी विश्रांती घेतली असून गेल्या चोवीस तासात शहर भागात ८.३० मि.मी., पूर्व उपनगरात १७.१० मि.मी., पश्चिम उपनगरात १४.९० मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता भरतीची वेळ असून यावेळी ३.८६ मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले..
वार्षिक सरासरीच्या ५१ टक्के पाऊस
मुंबईमध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५१ टक्के पाऊस पडला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यजल मापक यंत्रावरील आकडेवारीनुसार शहर भागात ५३ टक्के पाऊस, तर उपनगरात ४८ टक्के पाऊस पडला आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये २२०० ते २७०० मि.मी. पाऊस पडतो. यावेळी पावसाळ्यात आतापर्यंत केवळ २० दिवसात १२०० ते १४०० मि.मी. पाऊस पडला आहे.
