मुंबई : मुंबईतील वाढते तापमान, आद्र्रता आणि त्यामुळे जाणवणारा उष्मा यांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या वाढत्या उष्म्यामध्ये काळजी न घेतल्यास नागरिकांना उष्माघाताचा धोका असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस उकाडा कायम राहणार आहे. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आहे. त्यामुळे तापमानात घट न होता ते ३३ अंश सेल्सिअसइतके राहील. तसेच ते ३४ अंश सेल्सिअसखाली जाण्याची शक्यता कमी आहे.हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने बुधवारी ३३.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्राने ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. मुंबईतील आद्र्रतेमध्ये वाढ झाली असून हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ८० टक्क्यांच्या पुढे, तर सांताक्रूझ केंद्रात ७० टक्के होती. दुपारी १२ ते ३ या दरम्यान प्रखर उन्हात अतिनील किरणांच्या उत्सर्जनाचे प्रमाण खूप जास्त (यूव्ही इंडेक्स ९) असल्याची नोंद झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर प्रतिचक्रवात स्थिती निर्माण होते. त्यामुळे या दरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होते. आद्र्रतेमुळे दुपापर्यंत वातावरणात धुके राहते. सध्या हवेत धूळ साचत असल्यामुळे धुरके पसरते.बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक त्रास हा श्वसनाचे विकार असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उलटी होणे, चक्कर येणे, निर्जलीकरण होणे, बेशुद्ध पडणे असे त्रास होऊ लागले आहेत. तरुणांपेक्षा वयोवृद्धांना उष्माघाताचा त्रास अधिक होतो. वयोवृद्ध व्यक्ती या रक्तदाब, मधुमेह यासारख्या सहआजारांनी त्रस्त असतात. त्यांना वाढत्या उन्हाचा लगेचच त्रास होतो. त्यामुळे वयोवृद्ध व सहव्याधी असलेल्या नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घरातून बाहेर पडू नये, असा सल्ला नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिला.

हेही वाचा >>>विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणीसाठीही प्रतीक्षाच ; कायदेशीर प्रक्रियासुरू होण्यास अजून किमान तीन आठवडे

नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना टोपी, छत्री यासारख्या उन्हापासून संरक्षण करणाऱ्या गोष्टी जवळ बाळगाव्यात. या काळात प्रखर उन्हात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा ठप्प होऊन नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk of heat stroke due to increasing heat mumbai amy