लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने पुन्हा एकदा रस्ते धुण्यास सुरूवात केली आहे. प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी पाण्याची फवारणी केली जात आहे. त्याचबरोबर रस्ते ब्रशने स्वच्छ करून, पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टँकर तैनात करण्यात आले आहेत.

वातावरणातील बदलामुळे मुंबईतील हवेचा दर्जा बिघडत चालला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियमावली तयार केली आहे. त्या नियमावलीतील उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यात रस्त्यांच्या स्वच्छतेचाही समावेश आहे. त्याअंतर्गत आता धूळ प्रतिबंधासाठी रस्त्यांवर पाणी फवारणे, रस्ते पाण्याने धुणे अशा उपाययोजना केल्या जात आहे.

आणखी वाचा-तक्रार आल्यास आता झोपु योजनेचे ॲाडिट! थकीत भाड्यासाठी प्राधिकरणाची जोरदार कारवाई

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. त्यात बांधकामांशी संबंधित बाबींचाही समावेश आहे. वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या छोट्यामोठ्या घटकांवरही पालिकेच्या यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन वायू प्रदूषण आणि वातावरणातील बदलाचे परिणाम ओळखून त्यावर एकसंधपणे कार्यवाही सुरू केली आहे. त्यात, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, इमारत प्रस्ताव विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालय यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने (वॉर्ड) आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजांनुसार उपाययोजना आखल्या आहेत.

आणखी वाचा-मंत्री सत्कारात दंग, मुख्यमंत्री कामात व्यग्र; १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या छाननीचे काम सुरू

विविध प्रशासकीय विभागांमध्ये ट्रॅकवरील फॉग मिस्ट कॅनॉन यंत्रणेच्या माध्यमातून दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) पाण्याची फवारणी केली जात आहे. ज्या ठिकाणी बांधकाम, पाडकाम, खोदकाम सुरू आहे, अशा ठिकाणी प्रकर्षाने पाणी फवारले जाते. वॉर्डमधील दुय्यम अभियंता (पर्यावरण) विविध विभागांशी समन्वय साधून दररोज विविध स्थळांची पाहणी करून वाहनांचे मार्ग निश्चित करतात. त्याचबरोबर रस्ते ब्रशने स्वच्छ करून पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टँकर तैनात करण्यात आले आहेत. त्यात ५ हजार लीटर क्षमतेच्या ६७ आणि ९ हजार लीटर क्षमतेच्या ३९ टँकरचा समावेश आहे. रस्ते, पदपथ स्वच्छतेसाठी ई – स्वीपर संयंत्राचा वापर करण्यात येत आहे. जेणेकरून धूळीस प्रतिबंध करणे शक्य होईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

खुल्या जागेत किंवा मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी होत असल्याची खातरजमा केली जात आहे. विनापरवाना अथवा बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणाऱ्या तसेच वाहनांवर आच्छादन न टाकणाऱ्या, सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road washing experiment again to prevent pollution mumbai print news mrj