मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हाती घेतले असून याअंतर्गत मार्च – एप्रिल २०२३ या कालावधीत १९४ मुलांची घर वापसी करण्यात आली आहे. कौटुंबिक वाद, मुंबईचे आकर्षण आदी विविध कारणांमुळे मुले घरातून पळून मुंबईतील रेल्वे स्थानक गाठतात. मात्र, आरपीएफ विभागाने अशा मुलांचे मनपरिवर्तन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मध्य, पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरून ‘रेलनीर’ गायब; नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी

अन्य राज्यांतील मुलांना मुंबईचे खूप आकर्षण असते. त्यामुळे ही मुले मुंबईत येतात. तसेच, काही मुले भांडण किंवा कौटुंबिक कलहामुळे कुटुंबियांना न सांगता, रेल्वेने प्रवास करून मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकात पोहोचतात. मात्र अनोळखी, गजबजलेले शहर पाहून ही मुले हरखून जातात. अनेक वेळा ही मुले रेल्वे स्थानकाच्या एका कोपऱ्यात रडत बसतात. रेल्वे स्थानकात पालकांशिवाय किंवा घाबरलेली, रडत असलेली मुले दिसल्यास प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी अशा मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस करतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे पुन्हा जाण्याचा सल्ला देतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : ई नोंदणीत मोठी वाढ, मात्र अर्ज विक्री-स्वीकृतीला हवा तसा प्रतिसाद नाही

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत मार्च ते एप्रिल २०२३ या कालावधीत १९४ मुलांची घर वापसी केली. या मोहिमेत आरपीएफला रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. १९४ मुलांपैकी १४४ मुलगे आणि ५० मुलींचा समावेश आहे. ‘चाइल्डलाइन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांचे पालकांशी पुनर्मिलन करण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpf rescued 194 children under operation nanhe farishte between march to april 2023 mumbai print news zws