मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठोबाचे देर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेतर्फे नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज आदी ठिकाणांहून पंढपूरला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात येते. कोकणातूनही मोठ्या संख्येने वारकरी आषाढी पंढरपूरला जातात. परंतु, रेल्वेने सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी रेल्वेगाडी सोडलेली नाही.

कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गाने जवळ असले, तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो व प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेमार्गाने गेल्यास प्रवाशांचा प्रवास आरामदायक होईल. त्यामुळे १ ते १० जुलै दरम्यान सावंतवाडी – पंढरपूर रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.