लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळीये गावात दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने २६३ घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी ९२ घरे पूर्ण झाली आहेत, तर आता उर्वरित १०८ घरांचे काम वेगात सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील या घरांचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. ही घरे पूर्ण करून जूनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केली जाणार आहेत. मात्र, त्याच वेळी या प्रकल्पातील २६३ पैकी ६३ घरांसाठी मंडळाला अद्यापही जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या घरांचे काम रखडले आहे.

तळीये गावातील कोंढाळकरवाडी येथे जुलै २०२१ मध्ये दरड कोसळली होती. या दुर्घटनेत ६६ घरांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेनंतर ६६ दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे ६६ दरडग्रस्तांसह आसपासच्या धोकादायक क्षेत्रातील कुटुंबाचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाने २६३ घरांचा प्रकल्प हाती घेतला. २०० घरांसाठी मंडळाला जागा उपलब्ध झाली आणि त्यानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ९२ घरे बांधून पूर्ण करून यापैकी ६६ घरे दरडग्रस्तांना वितरीत करण्यात आली. तर उर्वरित २६ घरे सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, आता मंडळाने दुसऱ्या टप्प्यातील १०८ घरांच्या कामाला वेग दिला आहे.

आणखी वाचा-भायखळ्यातील भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण

६३ घरांसाठी अद्यापही जागा उपलब्ध नाही

दुसऱ्या टप्प्यातील काम वेगात सुरू असून १०८ घरांचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ही घरे रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येतील, अशी माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र त्याचवेळी ६३ घरांसाठी अद्यापही रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून जागाच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे ही ६३ घरे रखडल्याचेही त्यांनी सांगितले. जागा उपलब्ध होत नसल्याने ही ६३ घरे होणार की नाही हे अस्पष्ट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second phase of taliye rehabilitation will be completed in june mumbai print news mrj