मुंबई : अभिनेता शाहरुख खान याच्या निर्मिती कंपनीतील एका २८ वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या ६२ लाख रुपयांच्या भरपाईला उच्च न्यायालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. ही महिला कर्मचारी भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाली होती आणि चार वर्षांनतर तिचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबत मोटार वाहन अपघात दावा न्यायाधिकारणाने नोव्हेंबर २०२० मध्ये दिलेल्या आदेशात कोणतीही विकृती, बेकायदेशीरपणा किंवा अनियमितता आढळून आलेली नाही. त्यामुळे, न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करू शकत नाही, असे नमूद करीत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायामूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने न्यायाधिकणाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मोटार वाहन कायदा अपघातग्रस्त किंवा अपघातात मृत्यू पडलेल्यांना भरपाईचे लाभ देण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. त्याकडे, तसेच घटनेने नागरिकांना सन्मानाने निरोगी जीवन जगण्याच्या दिलेल्या अधिकाराच्या उल्लंघनाकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही, असेही न्यायालयाने आदेशान नमूद केले.
खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला, त्यानुसार, पैशाने जीवितहानी भरून काढता येऊ शकत नाही. परंतु, झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपघातग्रस्तांना परिपूर्ण भरपाई मिळणे अशक्य आहे. मात्र, योग्य भरपाई हे सर्वसामान्य प्रमाण असले पाहिजे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणी देखील शाहरूख खान याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या निर्मिती कंपनीत अॅनिमेटर म्हणून काम करणाऱ्या चारू खंडाल हिच्या कुटुंबीयांना किमान न्याय देता यावा यासाठी ६२ लाख रुपयांच्या भरपाईला मान्यता देणे योग्य ठरेल, असेही न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती सेठना यांच्या खंडपीठाने प्रामुख्याने अधोरेखीत केले. ही एका तरूण महत्त्वाकांक्षी व्यावसायिक महिलेची हृदयद्रावक आणि दुःखद कहाणी आहे. अपघातानंतर तिच्या वाटेला आयुष्य जगण्यासाठी ती पात्र नव्हती आणि नंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, असेही न्यायालयाने तिच्या कुटुंबीयांना दिलासा देताना नमूद केले.
विमा कंपनीने अति-तांत्रिक दृष्टीकोन बाळगू नये
अशा प्रकरणांत विमा कंपनी अति-तांत्रिक दृष्टिकोन बाळगू शकत नाही आणि पीडितेच्या कुटुंबाला कायदेशीररित्या पात्र असलेल्या विमा योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाने कंपनीचा युक्तिवाद फेटाळला. तसेच, खंडाल हिला अपघातात झालेल्या दुखापतींमुळे तिला संसर्ग होऊन नंतर त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा न्यायाधिकारणाने काढलेला निष्कर्ष योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. खंडाल हिच्या उपचारांसाठी १८ लाख रुपये खर्च झाले. पक्षाघात झालेल्या खंडाल हिला अपघातानंतरच्या काळात एका परिचारिकेची आणि फिजिओथेरपी सत्रांची आवश्यकता होती, असेही न्यायाधिकारणाने भरपाई मंजूर करताना म्हटले होते. तो निष्कर्षही चुकीचा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
प्रकरण काय ?
शाहरूख याच्या रा.वन चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करणाऱ्या खंडाल हिचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. त्या आधी म्हणजे मार्च २०१२ मध्ये खंडाल ही चित्रपटासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीतून रिक्षाने घरी परतत होती. त्यावेळी, एका भरधाव कारने तिच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात खंडाल हिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने तिला मानेच्या खाली अर्धांगवायू झाला होता. न्यायाधिकरणाने खंडाल हिच्या कुटुंबीयाना मंजूर केलेल्या भरपाईच्या आदेशाला चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अपघातानंतर खंडाल हिच्या कुटुंबाने जून २०१४ मध्ये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणासमोर भरपाईसाठी दावा दाखल केला होता आणि न्यायाधिकरणाने नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांना ६२ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने खंडाल हिच्या कुटुंबीयांना दिलासा देताना कंपनीची याचिका फेटाळून लावली.
विमा कंपनीचा दावा खंडाल हिचा मृत्यू हा तिला अपघातात झालेल्या दुखापतींमुळे झाला नाही. किंबहुना, अपघातानंतर चार वर्षांहून अधिक काळाने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, तिला झालेला अपघात आणि तिचा मृत्यू यांचा संबंध नाही, असा दावा विमा कंपनीने अपिलात केला होता. तसेच, खंडाल हिचा मृत्यू अपघातात तिला झालेल्या दुखापतींमुळे झाल्याचा न्यायाधिकरणाने तिच्या कुटुंबीयांना भरपाई मंजूर करताना काढलेला निष्कर्ष चुकीचा होता, असा दावाही कंपनीने केला होता.