केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींची घोषणा केली. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मध्य प्रदेशमधील भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत मोठा दावा केला आहे. “भाजपा श्रेष्ठींनाही मुख्यमंत्री शिवराजमामांना मध्य प्रदेश भाजपाच्या राजकारणातून ‘मोडीत’ काढायचेच आहे”, असा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला. मंगळवारी (१० ऑक्टोबर) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात ही भूमिका मांडण्यात आली आहे.

ठाकरे गटाने म्हटलं, “मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार, सामान्य जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी ‘विश्वगुरू’ बनण्याचा लागलेला ध्यास अशा अनेक गोष्टींचा हिसाब किताब पाच राज्यांच्या निवडणुकीत होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा पराभूतच झाला होता. मात्र नंतर काँग्रेसमधील ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा मोठा गट फोडून भाजपाने ऐन कोरोना काळात तेथे शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील ‘मोडतोड तांबा पितळ’ सरकार स्थापन केले होते. पुढील महिन्यात १७ तारखेला तेथील मतदारांनी हे सरकार भंगारात काढलेले दिसेल. नाहीतरी भाजपा श्रेष्ठींनाही मुख्यमंत्री शिवराजमामांना मध्य प्रदेश भाजपाच्या राजकारणातून ‘मोडीत’ काढायचेच आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात या वेळीही ‘कमळ’ नाही, तर ‘कमल’ फुलणार हे नक्की आहे.”

“भाजपाच्या हाती फार काही लागणार नाही”

“राजस्थानातही भाजपा श्रेष्ठींनी ‘शिवराज पॅटर्न’ राबवीत माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला केल्याने अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपालाच बसण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेशसिंग बघेल यांची मांड घट्ट आहे. तेथेही काँग्रेसला धोका नाही. तेलंगणामध्ये विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी त्रिकोणी लढत होईल. मात्र, तेथे भाजपाच्या हाती फार काही लागणार नाही असेच चित्र आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने भाजपाला टोला लगावला.

“लडाखमधील दारुण पराभवाचे पाणी भाजपाच्या नाकातोंडात”

ठाकरे गट पुढे म्हणाला, “मिझोराममध्ये काही मिळाले तरी त्याचा लाभ भाजपाला राष्ट्रीय पातळीवर होणार नाही. म्हणजे पाचपैकी चार राज्यांतील निकालांचा फायदा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनाच होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच बिथरलेला भाजपा आटापिटा करीत आहे. त्यात ‘लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’च्या निवडणुकीतील दारुण पराभवाचे पाणी आता भाजपाच्या नाकातोंडात गेले आहे. या ठिकाणी ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे.”

हेही वाचा : “दीपक केसरकर एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून…”; संजय राऊतांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

“निवडणुकांचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार”

“लडाखमधील भाजपचा धुव्वा ‘इंडिया’ आघाडीसाठी आणि पर्यायाने देशासाठी शुभशकूनच आहे. या शुभमुहूर्तावरच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर व्हाव्यात हादेखील एक चांगला योगायोग आहे. पाच राज्यांत वाजलेला विधानसभा निवडणुकांचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार आहे,” असं ठाकरे गटाने सांगितलं.