लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या चार भूखंडांवर २,३९८ घरांचे बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. चारपैकी तीन भूखंडांवरील २,१७५ घरांच्या बांधकामासाठीच्या निविदा अंतिम झाल्या असून राज्य सरकारने कंत्राटदारांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया पूर्ण करून मुंबई मंडळाने दोन दिवसांत २,१७५ घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

वादग्रस्त पत्राचाळ प्रकल्प मुंबई मंडळाकडे वर्ग झाल्यानंतर पुनर्वसित इमारतींसह २०१६ च्या सोडतीतील ३०६ घरांचा समावेश असलेल्या इमारतींच्या बांधकामाला मंडळाने सुरुवात केली. या इमारतींचे बांधकाम आता पूर्ण झाले असून मंडळाने या पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांपैकी चार भूखंडांवर सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘आर १’, ‘आर ७’, ‘आर ४’ आणि ‘आर १३’ या भूखंडांवर एकूण २,३९८ घरे बांधण्यासाठी काही दिवसांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. या निविदा प्रक्रियेनुसार चार भूखंडांवरील घरांच्या बांधकामासाठी १४ निविदा सादर झाल्या होत्या. ‘आर-१’, ‘आर-७’, ‘आर-४’ या भूखंडांवरील घरांच्या बांधकामासाठी प्रत्येकी तीन निविदा सादर झाल्या होत्या. बी. जी. शिर्के, वसंत विहार कन्स्ट्रक्शन आणि एनटीसी या कंपन्यांच्या निविदांचा त्यात समावेश होता. तर ‘आर-१३’ भूखंडावरील घरांच्या बांधकामासाठी एकूण पाच निविदा सादर झाल्या होत्या. रेलकॉन, वसंत विहार कन्स्ट्रक्शन, एनसीसी, सिद्धी अँड सन्स, तसेच देव इंजिनीअरिंग या कंपन्यांच्या निविदांचा त्यात समावेश होता.

आणखी वाचा-हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी गिरवले मूकबधीरांच्या सांकेतिक भाषेचे धडे

या निविदांची छाननी करून आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आल्या. तसेच आता निविदा अंतिम करण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. या निविदेस राज्य सरकारची मान्यता मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. ‘आर १’ आणि ‘आर ४’ या भूखंडावरील १,५९७ घरांच्या बांधकामाचे कंत्राट बी. जी. शिर्के समूहाला देण्यात आले आहे. या घरांच्या बांधकामासाठी एकूण ८७९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर ‘आर ७’ भूखंडावरील ५७८ घरांच्या बांधकामाचे कंत्राट वसंत विहार कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. या घरांसाठी ३०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, ‘आर १३’ भूखंडावरील घरांच्या बांधकामासाठी पाच निविदा सादर झाल्या असून बुधवारपर्यंत निविदा अंतिम करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली जाण्याची शक्यता आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर कामाला तत्काळ सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government approved appointment of contractors for construction of 2175 houses in patrachal mumbai print news mrj