लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथील टी जंक्शन परिसरातील रस्ते कामांचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धा तास कोंडीत अडकून रहावे लागत आहे.

नवी मुंबईवरून येणाऱ्या वाहनचालकांना घाटकोपर आणि पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मानखुर्दच्या टी जंक्शन परिसरातून जावे लागते. मात्र येथील रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी, गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याच मार्गाला लागून असलेल्या मानखुर्द – घाटकोपर जोड रस्त्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने येथे एक नवीन उड्डाणपूल बांधला आहे.

आणखी वाचा-अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

या उड्डाणपुलामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली होती. मात्र, रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसे विभागाध्यक्ष रवींद्र गवस यांनी दिला.

वाहतूक कोंडी वाशी पुलापर्यंत

मानखुर्द टी जंक्शनजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका थेट मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसत आहे. घाटकोपर, अंधेरीत जाणाऱ्या वाहनांच्या रांगा वाशी खाडीपुलापर्यंत पोहोचत आहेत.अनेकदा वाशी खाडी पुलापर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याने चेंबूर आणि शीवच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही त्याचा फटका बसत आहे. सकाळच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam due to road works in mankhurd t junction area mumbai print news mrj