शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज ( १२ फेब्रुवारी ) गोरेगावमध्ये उत्तर भारतीयांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राज्यपाल आणि हिंदुत्वावर भाष्य करत समाचार घेतला. महाविकास आघाडी स्थापन केली, तर हिंदुत्व सोडलं म्हणतात. आता, तुमच्याशी संवाद साधला तर, बोलणार उत्तर भारतीयांच्या मागे लागले, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अलीकडे पंतप्रधान मोदींनी बोहरा मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमाला भेट दिली. तेथील किचनमध्ये मोदींजींनी पोळी भाजली. हेच मी केलं असतं, तर हिंदुत्व सोडलं बोलले असते. त्यांचं मन मोठं आणि आमचं… त्यामुळे बघण्याची पद्धत बदलली पाहिजे. त्यांनी केलं तर माफ आणि आम्ही केलं तर गुन्हा,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

“काँग्रेसबरोबर जाण्यासाठी मला मजबूर करण्यात आलं. आमच्यातील काही लोकं गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत. हे आमचं हिंदुत्व नाही. गळ्यात कोणाचा तरी पट्टा बांधून गुलामगिरी करणं, शिवसेना प्रमुखांनी शिकवलं नाही,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे केला.

राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत; तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनच्या पार्सलने माघारी जात आहे,” असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attacks pm modi and bjp over bohara community function attend hindutva koshyari ssa