अकोला : भरधाव ट्रकने प्रवासी ऑटोला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावर मंगळवारी दुपारी घडली. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला.

जिल्ह्यातील पातूर-बाळापूर हा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. या मार्गावरून भरधाव वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. दरम्यान, पातूर येथून प्रवासी ऑटो (क्र. एम.एच.३० बीसी २०७१) अंबाशी येथे जात होता. एका ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऑटोला मागून धडक दिली. त्यामुळे ऑटो वेगाने समोर गेला. त्यातच विरूद्ध दिशेने समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमपी ०९ एचएच ४४२६) ऑटोला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.

ऑटोतील प्रवासी रस्त्यावर फेकल्या गेले. या अपघातात दोघांना आपला जीव गमावा लागला आहे. चार प्रवासी गंभीर जखमी झाले. ऑटोमधील प्रवासी पीयूष रविंद्र चतरकर (वय १३ रा.सिंधी कॅम्प, अकोला) आणि लिलाबाई ढोरे (वय ५० रा.लाखनवाडा) असे अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. सुरेंद्र चतरकर (वय ४५), रवींद्र चतरकर (वय ५२), रूपचंद वाकोडे (वय ५०), प्रमिलाबाई वाकोडे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमींना उपचारार्थ पोलिसांनी रुग्णवाहिकेतून अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहते बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालक हा घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अपघाताचे प्रमाण वाढले

अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. भरधाव व अनियंत्रित वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. चालकाकडून वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. या अपघातांमध्ये शेकडो जणांचा बळी गेला, हजारो जण जखमी झाले आहेत. तरीही अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहनधारकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.