अकोला : मालपुरा येथील बहुचर्चित शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्घृण हत्या प्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांना अकोट विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला. न्यायाधीश चकोर बाविस्कर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारका हरिभाऊ तेलगोटे (५०), श्याम ऊर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) सर्व रा. अकोट अशी आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्याकांड प्रकरणी मृताचा मुलगा फिर्यादी यश बाबुराव चऱ्हाटे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात २८ जून २०१५ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार ग्राम मालपुरा येथे धनराज सुखदेव चऱ्हाटे यांचे शेत आहे. त्यांची बहीण द्वारका तेलगोटे हिने वारसा हक्काप्रमाणे शेतीचा हिस्सा मिळण्यासाठी तेल्हारा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो दावा प्रलंबित असताना घटनेच्या एक महिना अगोदर द्वारका तेलगोटे हिने शेतात दोन एकर जमिनीवर पेरणी केली. त्यावर धनराज चऱ्हाटे व त्यांचे भाऊ बाबुराव चऱ्हाटे यांनी पुन्हा पेरणी केली. त्यावरून भावा-बहिणीमध्ये मोठा वाद झाला. २८ जून २०१५ रोजी दुपारी ३ वाजता द्वारका तेलगोटे, तिचा पती हरिभाऊ, मुलगा श्याम, दुसरा अल्पवयीन मुलगा मालपुरा गावात आले.

हेही वाचा…नागपूर : तरुण जोडप्याला लुटणाऱ्या ‘त्या’ पोलीसांना अटकपूर्व जामीन…

या चौघांनी संगनमत करून शेतीच्या वादातून धनराज सुखदेव चऱ्हाटे, शुभम धनराज चऱ्हाटे, गौरव धनराज चऱ्हाटे व बाबुराव सुखदेव चऱ्हाटे या चौघांची धारदार शस्त्र विळा, चाकू व कुऱ्हाडीने गंभीर वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला. दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले.

न्यायालयाने आरोपींना ३ मे २०२४ रोजी दोषी ठरवले. त्यावर अकोट वि. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शुक्रवारी शिक्षा सुनावली. तिन्ही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व प्रत्येकी ५० हजारांचा दंड व दंड न भरल्यास आरोपींना पाच वर्षांच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावली. भादंवि कलम ५०६ (भाग २) सह ३४ या कलमांतर्गत तिन्ही आरोपींना प्रत्येकी सात वर्षांचा सश्रम करावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला.

हेही वाचा…नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले

आरोपींनी दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. आरोपींना कारावासाची शिक्षा एकत्रितरित्या भोगावी लागणार आहे. चारही मृताच्या कायदेशीर वारसाला त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना नुकसान भरपाई योजनेंतर्गत आर्थिक व अन्य मदतीसाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे सर्व पूर्तता करून प्रस्ताव पाठवण्यात यावा, असा आदेशही देण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ॲड. जी.एल. इंगोले यांनी बाजू मांडली, तर पैरवी म्हणून विजय सोळंके यांनी काम पाहिले. अकोट न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल असून प्रथमच एकाचवेळी तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा….. तर राज्यात वीज संकट.. कोराडीतील ६६० मेगावाॅटचा संच बंद

साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण

या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात एकूण २१ साक्षीदारांच्या साक्षी सरकारी वकील ॲड. जी.एल. इंगोले यांनी नोंदवल्या. यामध्ये डॉक्टर, अधिकारी, सीए तसेच प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akot court sentences three family members to death for brutal 2015 land dispute murders ppd 88 psg