नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर आरोप केला. त्याला अनिल देशमुखांनी आपल्या शैलीत प्रतिउत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वझे यांचे त्रिकुट होते. त्यामुळे अँटिलिया प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या हत्येबाबत फडणवीसांना कल्पना असणे साहजिक आहे, असा दावा माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी येथे केला. ते नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा – सिंदखेड राजा, बुलढाण्याचा तिढा मुंबईतच सुटण्याची चिन्हे, अपक्षांचीही मनधरणी

फडणवीस यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीव्दारे आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होते की नव्हते? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे, असे म्हटले होते. त्यासंदर्भात अनिल देशमुख म्हणाले, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. कुटुंबीयांनी मृतदेह मनसुख हिरेनचा असल्याची खात्री केल्यानंतरच राज्य सरकारतर्फे मृत व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आले. मला ही घटना माहिती होती, पण जोपर्यंत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील मंडळी मृतदेह बघून त्याची ओखळ करून घेत नाही, तोपर्यंत पोलीस खात्याला त्याबाबत जाहीररित्या सांगता येत नाही. ही पोलीस खात्याची कार्यपद्धती आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना ती माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते.

परमवीर सिंह यांना फडणवीसांचे संरक्षण

अँटिलिया प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एनआयएकडून अटक केली जाणार होती. पण, फडणवीसांनी त्यांना संरक्षण दिल्यामुळे अटक झाली नाही. हा सर्व घटनाक्रम बघता हिरेनच्या हत्येबाबत फडणवीसांना १०० टक्के माहिती असावी. परमबीर सिंह यांना माझ्याविरुद्ध खोटे आरोप करण्यास फडणवीसांनी सांगितले. त्यानंतर माझ्यामागे ईडी, सीबीआयच्या चौकशीची ससेमिरा लावला. तसेच खोट्या गुन्ह्यात अटक केली आणि १४ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. फडणवीसांनी त्यांच्या पक्षातील वरिष्ठाच्या मदतीने मला खोट्या आरोपात फसवले, असा आरोपही देशमुख यांनी केला.

हेही वाचा – उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला सर्वाधिक फटका

अजित पवारांवर टीका

अजित पवार यांनी आबा ऊर्फ आर.आर. पाटीलांनी सिंचन घोटाळ्यात आपल्याला गुंतवले, असा आरोप केला होता. त्यावर अनिल देशमुख म्हणाले, जी व्यक्ती हयातीत नाही. त्या व्यक्तीबद्दल असे बोलणे योग्य नाही. पण, अजितदादा आता देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसलेले आहेत. त्यामुळे फडणवीस जे सांगितले, ते अजितदादा बोलतात, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh criticizes ajit pawar what anil deshmukh say about devendra fadnavis rr patil and mansukh hiren print politics news ssb