नागपूर: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बच्चू कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. बच्चू कडू हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतः मंत्री होते. त्यानंतर शिवसेना पक्ष फुटल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. तर नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर बच्चू कडू यांनी सरकारविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात एक व्यंगचित्र तयार करून थेट सरकारला प्रश्न विचारले आहेत.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्याचे योजिले आहे. अजित पवार यांनी आपण कुठेही कर्जमाफीसंदर्भात बोललो नसल्याचे वक्तव्य केले आहे. यावर भाष्य करताना कडूंनी ‘भाजप हा राष्ट्रवादीचा बाप असल्याचा टोला लगावला होता. तर पुढील महिन्यापासून त्यांनी आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. बच्चू कडू यांनी आपण ‘डीसीएम टू सीएम’ आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. आंदोलनाची सुरुवात बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर होणार असून शेवट नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केला जाणार आहे, असेही कडू म्हणाले होते. यानंतर आता बच्चू कडू यांच्या पक्षाकडून एक कार्टून व्हायरल केले जात आहे. ज्यामध्ये कडू यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला आहे, तसेच निवडणुकीत दिलेल्या घोषणांवर प्रश्न केलेला आहे. हे कार्टून सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे.
बच्चू कडू यांच्या कार्टूनमधून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, ७२ हजार रोजगारांची कधी निर्मिती होणार, दिव्यांगला न्याय कधी मिळणार, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार, असे अनेक प्रश्न या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच झेपणार नव्हते तर खोटे आश्वासन दिले कशाला? असा प्रश्नही केला आहे. या कार्टूनला ‘कडू सवाल’ असे नाव देण्यात आले आहे.
७ जुलैपासून मोझरी येथे आमरण उपोषण
अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर ७ जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.