नागपूर : नितीन गडकरी यांनी केंद्रात रस्ते व परिवहन खात्याचा कारभार सांभाळल्यापासून देशभरात रस्ते बांधणीला वेग आला आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यत रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे उभारण्यात येत आहेत. नागपुरातही मोठ्या संख्येने उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत.

अमरावती महामार्गावरील ब्लॅक स्पॉट संपवणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मे २०२१ मध्ये दोन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील वाडी पोलिस स्टेशन ते गुरुद्वारा (१.९५ किमी) उड्डाणपूल सुरू झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ते नागपूर विद्यापीठ कॅम्पसपर्यंतचे (२.८५ किमी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. १५ ऑगस्टपूर्वी हा उड्डाणपूल सुरू होणार आहे.

प्रारंभी ३१ ऑगस्ट २०२४ मुदत होती. ती वाढवून आता १ जुलै २०२५ झाली असताना अद्यापही काम न झाल्याने आता नवीन मुहूर्त पुढे आला आहे. गडकरी यांच्या पुढाकाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून तर वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या ५ कि.मी. अंतरावर दोन उड्डाणपूल बांधण्यास प्रारंभ झाला. अमरावती महामार्गावरील वाडी नाका ते वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या सुमारे अडीच किमीचा उड्डाणपूल सुरू झाला. अमरावती महामार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पात, फुटाळा तलाव चौक, विद्यापीठ कॅम्पस ते आरटीओ पर्यंतच्या पुलाचे काम रेंगाळले आहे. आरटीओ कार्यालयासमोरील जुन्या नाल्यावर पूल बांधण्याचे काम केले जात आहे. याशिवाय आरटीओ ते बोले पेट्रोल पंपपर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पहिल्या टप्प्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय ते विद्यापीठ कॅम्पसपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र अनेक अडचणीमुळे हा मार्ग तयार करण्यासाठी विलंब झाला आहे. सध्या नाल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जुलै २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. एकूण ४७८ कोटींच्या दोन उड्डाणपुलाला अतिरिक्त कालावधी लागल्याने प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. आरटीओ कार्यालय ते रवीनगर चौकापर्यंतची झाडे तोडण्याची परवानगी उशिरा मिळाल्याने उड्डाणपुलाच्या बांधकामाला उशीर झाला होता.