चंद्रपूर: माणसाच्या मदतीशिवाय तलाव, जलाशय व नदीतीची सफाई अशक्य आहे. मात्र येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील उपकरणीकरण अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक व मुख्य अन्वेषक डॉ.पी.एस.लोंढे यांनी मानवरहित ‘ॲक्वारोवर’ रोबोटिक रिमोट कंट्रोल यंत्राची निर्मिती केली आहे.
सौर ऊर्जा व बॅटरीवर चालणारे हे ॲक्वारोवर रोबोट पाण्याची गुणवत्ता आणि प्रदूषण पातळी व इतर मौल्यवान माहितीचे संकलन करण्यास मदत करणारे आहे.
पाण्याच्या पृष्ठभागावरून कचरा, प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करण्यासाठी विविध यंत्रणांनी सुसज्ज असलेले ॲक्वारोवर हे बरेच उपयोगी ठरत आहे. रोबोटची चाचणी चंद्रपूर येथील रामाळा तलाव येथे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. या प्रकल्पासाठी गोंडवाना विद्यापिठ गडचिरोलीतर्फे २ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता.
याचे मुख्य उद्दिष्ट जलस्रोतांची स्वच्छता करणे, पाण्याची गुणवत्ता तपासणे, प्रदूषणाशी संबंधित समस्या सोडवणे आहे. लहान आणि मोठ्या जलक्षेत्रांसाठी पर्यावरणपूरक उपाय प्रदान करण्यासाठी या रिमोट कंट्रोल्ड रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे.
या रोबोटीक मॉडेल यंत्रामध्ये गंज प्रतिरोधक ॲल्युमिनीयम बॉडी, बॅटरी, वायरलेस मोटर, वायरलेस रिमोट कंट्रोल, कॅमेरा, आधूनिक सेन्सर्स आणि सौर उर्जेवर चालणारे सोलर पॅनल्स इत्यादींचा वापर करण्यात आलेला आहे. रोबोटची प्रणाली बॅटरी सोबतच सोलर पॅनलवर चालत
असल्याने ती अधिक कार्यक्षम व पर्यावरणपुरक आहे. ॲक्वारोवर रोबोट हा रिमोटली ऑपरेटेड असल्यामुळे प्रदूषित पाण्यात प्रवेश करण्याची गरज नाहीशी होते. पाण्याची गुणवत्ता आणि प्रदूषण पातळी व इतर मौल्यवान माहितीचे संकलन करण्यास आणि जलस्रोतांना निरोगी आणि स्वच्छ बनविण्यास मदत मिळते.