नागपूर: विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजनेत दीड हजारांहून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आर्थिक कारणामुळे सरकार ते देण्याचे टाळत आहे. आता त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नागपूरमध्ये सरकारला लक्ष्य केले आहे.
महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गंत लाडकी बहिणी योजना आहे. महायुती सरकारने १०० दिवसांनी विविध खात्यांनी बजावलेल्या कामगिरीचा अहवाल तयार केला आहे आणि संबंधित खात्यांची क्रमवारी ठरवली आहे. पहिल्या क्रमांकावर महिला व बालकल्याण खाते आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी सरकारची खिल्ली उडवली. ‘अपयशी लोकांना पाहिले स्थान देणारा क्रम लावला की काय’ अशी उपरोधीक टीका थोरात यांनी शुक्रवारी नागपुरात बोलताना केली.
निवडणूक जिंकताच महायुती सरकारने लाभार्थी महिलांची नावे योजनेतून कमी करणे सुरू केले आहे. लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आले. आता तर दीड हजार रुपयेसुद्धा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयेच मिळतील, असेही जाहीर केले आहे. महिलांची फसवणूक करणाऱ्या महिला व बाल विकास विभागाला सर्वाधिक रेटिंग देण्यात आले. महिलांची दिशाभूल करण्यासाठी पहिला क्रमांक देण्यात आला की काय, असा प्रश्नही त्यांनी केला.
जागोजागी रस्त्यावर असलेले खड्डे आहेत. रस्ते नीट करण्याचे काम असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. खड्ड्यागणिक सरकारची आठवण राहावी. यासाठी या खात्याने केलेल्या कामगिरीसाठी हा क्रमांक देण्यात आला, अशा शब्दात थोरात यांनी खिल्ली उडवली.
पीक विमा योजना बंद केली. तसेच शेतकऱ्यांना लग्न, बारश्यासाठी कर्जमाफी हवी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. त्याबदल्यात त्यांच्या खात्याला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. मंत्री नीतेश राणे यांचे ‘महान’ कार्य सुरू आहे. दोन समाजात भेद कसा निर्माण करता येईल. यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे त्यांच्यावर खूश होऊन सरकारने त्यांच्या मत्स्य व बंदरे विभागाला पाचवे स्थान दिले असावे, असेही ते म्हणाले.
परिवहन खात्यावर टीका
राज्य परिवहन खात्याचा कारभार तर उत्तम सुरू आहे. एसटी. बसेस जागोजागी बंद पडत आहेत. बसेस देखभाल-दुरुस्ती अभावी खिळखिळ्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतनात ५४ टक्के कपात करण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यानंतरही खात्यात चांगल्या कामगिरीत क्रमांक लागला आहे, अशी टीकाही थोरात यांनी केली.