यवतमाळ: शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. येथील समता मैदानात आयोजित पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते आज, रविवारी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतीमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन होणार आहे. या माध्यमातून शेतीमध्ये अजून चांगले काय करू शकतो याची कल्पना शेतकऱ्यांना येईल, असे संजय राठोड म्हणाले. आज कापूस, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शासन याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

हेही वाचा – महायुतीच्या बैठकीत आमदार बच्‍चू कडूंच्या अनुपस्थितीची चर्चा

जलयुक्त शिवार योजना आणि मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत जिल्ह्यात ६०० कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मॉडेल शाळा सुरू करणार आहोत. वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन अनुदान तत्त्वावर देण्यात येणार असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हा जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या महोत्सवात विविध विभागाचे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी केले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व प्रगतीशिल शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा – बुलढाणा : “जो उमेदवार असेल त्याचा ताकदीने प्रचार करावा”, महायुतीच्या गुप्त बैठकीतील सूर; उमेदवार ठरला नसल्याचे चित्र!

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतष डाबरे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे आदी उपस्थित होते. या कृषी महोत्सवात कृषी निविष्ठा दालन, शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, गृहोपयोगी वस्तू, बचत गट, कृषी यंत्र व साहित्य, रोजगार दालन तसेच ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers should adopt modern technology and make progress guardian minister sanjay rathod appeal at yavatmal nrp 78 ssb