नागपूर : शहरात उन्हाचा तडाखा वाढत आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा एमआयडीसी परिसरातील वर्षा प्रिटींग सहित्य आणि पेन शाई उत्पादक कंपनीला आग लागून त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले. कंपनीत केमिकल्स असल्यामुळे आगीचा भडका उडाला. अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचल्यानंतर जवळपास दोन तासानंतर आग आटोक्यात आणली गेली. या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमआयडीसी परिसरात महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीच्या मागे वर्षा प्रिंटींग साहित्य आणि पेनची शाई उत्पादक कंपनी आहे. सकाळी सातच्या सुमारास कंपनीतून धूर निघत असल्याचे दिसल्यावर तेथील एका सुरक्षा रक्षकाने आणि परिसरातील एका व्यक्तीने अग्निशमन विभागाला माहिती दिली. एमआयडी अग्निशमन केंद्रातील २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागपूरातून सिव्हील आणि त्रिमूर्तीनगर येथून तीन गाड्या रवाना करण्यात आल्यानंतर आग पसरु नये म्हणून पाण्याचा मारा करण्यात आला.

हेही वाचा…पिस्तुलचा धाक दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणे भोवले, ठाणेदार…

कंपनीच्या दरवाज्याचे कुलुप तोडण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आतमध्ये जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान केमिकल्स पदार्थामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होऊ लागला. बुधवारी कंपनी बंद होती आणि आज सकाळी साडेनऊ वाजता कंपनी सुरु होणार होती.

या कंपनीत ५० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. मात्र सकाळीच आगीची घटना घडल्यामुळे मोठी घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. शहरातील एमआयडीसीमधील कंपनीत अग्निसुरक्षा यंत्रणा बंधनकारक असल्यामुळे या कंपनीत यंत्रणा होती की नाही याबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपास केला जाणार आहे. गेल्या सहा महिन्यात एमआयडीसीमधील छोट्या मोठ्या सात कंपनीमध्ये आगीच्या घटना घडल्याचे समोर आले असून त्यातील अनेक कंपनीमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा कमकुवत असल्याचे समोर आले होते.

हेही वाचा…लोकजागर: निवडणूक आख्यान – तीन

एमआयडीसी अग्निशमन विभागाने अशा कंपनीला नोटीस देत बंद असलेली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यानंतरही अनेक कंपन्यानी दुर्लक्ष केले आहे. महापालिकेने शहराच्या बाहेर आणि शहरात असलेल्या निवासी इमारतीमध्ये असलेल्या छोटे उद्योगामध्ये अग्निशमन यंत्रणा आहे की नाही याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा…नवतपाच्या आगमनाला वेळ, पण विदर्भ तापू लागला; सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यात

दरम्यान, गेल्या काही दिवसात शहरात तापमान वाढत असताना आगीच्या घटना वाढल्या आहे. गेल्या आठ दिवसात शहरात आगीच्या सात घटना घडल्या असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने त्यावर नियंत्रण मिळवले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire erupts at varsha printing and pen ink manufacturing company in nagpur s hingna midc no casualties reported vmb 67 psg