लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन तालुक्यासह जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील लाखो ग्रामस्थांना अतिवृष्टीचे थैमान अनुभवयास मिळाले. २ सप्टेंबर रोजी झालेल्या कोसळधार पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सुपीक शेत जमीन खरडून वा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे जन्मभराचे नुकसान झाले आहे.

३० ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. सोमवारी, २ सप्टेंबर रोजी याचा प्रकोप जास्त होता. पाच तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. इतर आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तेरा महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली. शेगाव तालुक्यातील शेगाव ( ९३.५० ) , माटरगाव ( ७० मिलिमीटर), जलंब ( ८७.३० मिमी) मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे (८१ मिलिमीटर) , रोहिणखेड (१३३.३०) आणि पिंपळगाव देवी (८१ मिमी) ,नांदुरा तालुक्यातील नांदुरा (१०५ मिमी),निमगाव (७४.३० मिमी), बुलढाणा तालुक्यातील बुलढाणा ( ७०मिमी),धाड ( ७६ मिमी), पाडली ( १०१.५०), देऊळघाट ( ७१.८ मिमी) , मलकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा( ९६) या महसूल मंडळात अतिवृष्टी ची नोंद झाली. ३ तारखेला पावसाची तीव्रता तुलनेने कमी होती. संततधार पावसाने हजारो हेक्टरवरील बहरलेल्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील शेत जमिनीत पांवसाचे पाणी साचल्याने पिके बुडाली असून शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. कृषी विभागाने प्राथमिक पाहणी केली.

आणखी वाचा-‘लालपरी’ थांबलेलीच… एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; लाखावर प्रवाशांचे हाल

१४० गावांना फटका

२ आणि ३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने खरीप पिकांची अतोनात नासाडी झाली आहे. याचा प्राथमिक स्वरूपाचा अहवाल कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी सादर केला आहे. प्राथमिक अहवालाच गंभीर असल्याने प्रत्यक्षात झालेले नुकसान किती प्रचंड असेल याचा अंदाज येतो. यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

बुलढाणा, चिखली, खामगाव,शेगाव, नांदुरा, मेहकर या तालुक्यातील तब्बल १४० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. यामुळे १६ हजार८३८ शेतकऱ्यांना बाधित झाले. यापरिनामी ११ हजार ३०१ हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तूर , मका या पिकांची अतोनात नासाडी झाली आहे. चिखली (३२ गावे, ३८० हेक्टर बाधित क्षेत्र), खामगाव (२५ गावे, १७०० हेक्टर), शेगाव (२० गावे, ९५० हेक्टर बाधित क्षेत्र), या तालुक्यातील नुकसान व बाधित गावांची संख्या जास्त आहे.

आणखी वाचा-पुतळ्यांवरून वाद! बुलढाण्यात शिवसेना-काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली…

मेहकरमध्ये हाहाकार

मेहकर तालुक्याला अतिवृष्टीचा दुहेरी फटका बसला आहे. ३६३ शेतकऱ्यांच्या ३३१ हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी चे नुकसान झाले आहे. याशिवाय तालुक्यातील ४८ हेक्टर सुपीक शेत जमीन वाहून वा खरडून गेली आहे.यामुळे शेतकाऱ्यांचे कधी भरून निघणारे नुकसान झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in buldhana district cause severe damage to crops scm 61 mrj