बुलढाणा : बायकोत लई जीव म्हणा किंवा अन्य कारण म्हणा, बायकोसोबत नुसता बोलला म्हणून नवरोबाने एका इसमास अगोदर पत्नीच्या भावाच्या (साळ्याच्या) मदतीने झोडपले! यावर कळस म्हणजे ‘त्याने’ पोलिसांत तक्रार केल्यावर तिघा मित्रांच्या मदतीने ‘त्याला’ लोखंडी पाइप आणि काठीने पुन्हा बेदम मारहाण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षुल्लक कारणावरून मारहाणीची ही अजब गजब घटना मोताळा तालुक्यात घडली. या घटनेची मोताळा परिसरात खमंग चर्चा होत बेदम मारहाणीच्या कारणाचा खुलासा झाल्यावर पोलीस दादाही चक्रावले!. विजय हरिभाऊ चितरंग असे एकदा नव्हे दोनदा मारहाण झालेल्या व्यक्तीचे ( फिर्यादीचे) नाव आहे. चितरंग हे मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे राहतात. त्यांची शेती असून आता शेती आतबट्ट्याचा आणि बेभरवशाचा धंदा झाला आहे. त्यामुळे अलीकडेच त्यांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेत जमीन खरेदी विक्री व्यवहारात एजंट म्हणूनही काम सुरू केले आहे. त्यामुळे दोन पैसे शिल्लक मिळत असल्याने घरची स्थिती सुधारली. प्रामुख्याने मलकापूर, मोताळा या तालुक्यातील शेत जमिनीचे व्यवहार करण्यावर त्यांचा भर आहे.

हेही वाचा : ‘एमपीएससी’चे दुर्लक्ष; टंकलेखन परीक्षार्थींचे भविष्य अंधारात, ‘किबोर्ड’च्या…

घटना प्रसंगी काल रात्री विजय चितरंग हे घरी आराम करीत होते. यावेळी गोपाल तुकाराम सांबारे व त्याचा साळा मोहन पंडित हे दोघे त्यांच्या घरी आले. यावेळी, ‘तू माझ्या बायको सोबत का बोलतो?’ असे म्हणत गोपालने विजयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. सोबतच्या मोहन पंडित याने देखील विजय चितरंग यांना मारहाण केली. यामुळे विजय हे जखमी झाले. मारहाणी नंतर गोपाल आणि मोहन हे चितरंग याना जीवे मारण्याची धमकी देऊन दोघेही तेथून निघून गेले. यामुळे भयभीत झालेल्या विजय चितरंग यांनी सरळ मलकापूर पोलीस ठाणे गाठत गोपाल सांबारे व मोहन पंडीत याच्या विरोधात तक्रार दिली.

हेही वाचा : चंद्रपूर : अंत्ययात्रेला हजारो फटाक्यांची आतिशबाजी, पन्नास वाहने…गोंडपिंपरी तालुक्यात भावंडांकडून वडिलांना आगळा वेगळा निरोप

दुसऱ्यांदा चौघांची मारहाण

या घटनेची ( पोलीस तक्रारीची) माहिती गोपाल सांबारे व त्यांच्या सहकाऱ्यांना प्राप्त झाली. यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. चितरंग याला ‘पहावेच लागते’ असे त्यांचे ठरले. दरम्यान विजय चितरंग हे शेत पाहण्यासाठी शेलापुर ( तालुका मोताळा) येथे आले. शेलापुर मोताळा जाणाऱ्या मुख्य मार्गावर ते उभे असताना तिथे गोपाल तुकाराम सांबारे, प्रसाद गोपाल सांबारे, गणेश सोनवणे व मोहन पंडित हे चार जण आले. आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, तुझी हिम्मतच कशी झाली? अशी विचारणा गोपाल याने केली .एवढ्यावरच न थांबता गोपाल आणि प्रसाद यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपाने चितरंग यांच्या पायावर वार केले. मोहनने हातापायावर लोखंडी पाईपाने मारहाण केली. गणेश सोनवणे याने लाकडी काठीने व दगडाने दोन्ही पाय व पाठीवर मारहाण केली. चौघांनी मिळून विजय चितरंग यांना बेदम मारहाण केली. यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे विजय चितरंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवाल वरून बोराखेडी पोलिसांनी चौघां विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमावरून गुन्हे दाखल केले आहे. बोराखेडी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली या मजेदार आणि तितक्याच विचित्र घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana husband beat a property agent for speaking with his wife scm 61 css