नागपूर : भारतातून सात दशकांपूर्वी नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतीय भूमीवर दाखल झाले. नामिबियातून आणलेले पाच मादी आणि तीन नर चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा देशात येणे हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच नामिबियाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<< मोदींकडून राष्ट्रउभारणीसाठी अतुलनीय परिश्रम; वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशांत मान्यवरांची भावना; नेते, चित्रपट तारे-तारकांकडून अभीष्टचिंतन

हेही वाचा <<< लाखो मातांचे आशीर्वाद माझ्यासाठी ऊर्जा, प्रेरणा, संरक्षणकवच : मोदी; बचत गटांतील महिलांशी संवाद

नामिबियाहून विशेष बोईंग ७४७-४०० विमानाने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शनिवारी सकाळी ८च्या सुमारास चित्त्यांचे आगमन झाले. ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरने श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणले. उद्यानात एक मंच तयार करण्यात आला होता आणि त्याच्या खाली चित्त्यांचे पिंजरे ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० वाजता पिंजऱ्याचे दार उघडून तीन चित्त्यांना सोडले. त्यांनी या ठिपकेदार प्राण्याची छायाचित्रे एका व्यावसायिक कॅमेऱ्यातून टिपली. उर्वरित पाच चित्ते इतर मान्यवरांनी सोडले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्री भुपेंदर यादव होते.

हेही वाचा <<< दोनतृतीयांश आमदारांच्या पक्षांतरावर दोन राज्यांमधील भिन्न भूमिका; गोव्यात काँग्रेस बंडखोरांचा गट भाजपमध्ये विलीन; राज्यात शिंदे गटाचा शिवसेनेवरच दावा

मोदींच्या विधानावरून राजकीय वादाची चिन्हे

१९५२ साली भारतातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. पण गेल्या सात दशकांपासून त्यांना भारतात परत आणण्यासाठी कोणतेही विधायक प्रयत्न करण्यात आले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण १९७० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरू केली होती. दरम्यान, इराणमध्ये सत्तांतर झाले आणि हा प्रकल्प बारगळला. त्यानंतर २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ‘भारतातील आफ्रिकन चित्त्याची ओळख’ या प्रकल्पाची संकल्पना तयार करण्यात आली. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. २०२० साली सर्वोच्च न्यायालयाने भारतात चित्ते आणण्यास परवानगी दिली. मात्र, करोनामुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यानंतर २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.

हेही वाचा <<< हैदराबाद मुक्तिदिनावरून शहा-राव शाब्दिक चकमक; भाजप आणि तेलंगणा राष्ट्र समितीत वाद 

नामिबियातून भारतात..

सलग २० तासांत आठ हजार किलोमीटर अंतर कापून चित्ते भारतात पोहोचले. नामिबियातील चित्ता संवर्धन फाऊंडेशनचे एक पथक चित्त्यांबरोबर आले आहे. जगातील हा पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी वन्य प्राण्यांचा स्थलांतर प्रकल्प आहे. त्यामुळे सर्व जगाचे या प्रकल्पाकडे लक्ष लागले होते. या आठही चित्त्यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आले आहेत.

महिनाभर विशेष देखरेखीखाली..

  • विंद्याचल पर्वताच्या उत्तरेकडे वसलेले कुनो राष्ट्रीय उद्यान ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे.
  • या ठिकाणी चित्त्यांसाठी १२ किलोमीटरचे कुंपण उभारण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांना एक महिना या विशेष अधिवासात म्हणजे विलगीकरणात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल.
  • चित्त्यांसाठी हरीण सोडण्यात येणार असून भारतीय हरणांच्या शिकारीला ते सरावल्यानंतर त्यांना मूळ राष्ट्रीय उद्यानात सोडले जाईल.

१९५२मध्ये भारतातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले, पण गेल्या सात दशकांपासून त्यांना भारतात आणण्यासाठी कोणतेही विधायक प्रयत्न करण्यात आले नाहीत हे दुर्दैवी आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard country liberation national park prime minister narendra modi ysh