“आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्याच्या अवतीभवती असलेल्या चार -पाच बडव्यांनी त्यांना घेरले आहे. त्यामुळे 'मातोश्री' बदनाम होत आहे.” अशी टीका मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. “शिवसेनेतील फुटीसाठी हे बडवेच कारणीभूत आहेत. यांच्यामुळेच आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट होत नाही, त्यांचा वेळ मिळत नाही. मी बडव्यांची नावे घेणार नाही, पण मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय? कौशल्य काय? हे सर्वांनाचा माहीत आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाहीत.”, असा आरोपही भुयार यांनी केला आहे. तसेच, “मी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीसोबतच आहे आणि राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार जसा आदेश देतील, त्याप्रमाणे मी काम करणार आहे. आघाडी सरकारवरचे संकट दूर होईल. शिवसेनेतील बंड करून बाहेर गेलेले आमदार दोन-तीन दिवसांत परत येतील.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.