अमरावती : देशातील भावी पिढीचे भवितव्य उज्वल करायचे असेल शाळांमध्ये मोबाईल बंदी करणे अत्यावश्यक असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात यावी, यासाठी आर्वी मतदार संघाचे आमदार सुमीत वानखेडे येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार आहेत. विशेष म्हणजे वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून मोबाईल बंदी करण्याबाबत विनंती केली आहे. अमरावती जिल्ह्यातील शिक्षक सुधीर केने यांच्या संशोधनाची दखल घेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक सुधीर पंजाबराव केने यांनी मोबाईलच्या वापरासंदर्भात संशोधन केले आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत नोंदी घेतल्या. या बाबत बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, अस्थी रोग तज्ज्ञ, मेंदू विकार तज्ञांच्या मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मोबाईलच्या व्यसनामुळे विद्यार्थ्याना भविष्यात कर्करोग, मानदुखी, विसरभोळेपणा, चिडचिडेपणा, अंधत्व, चक्कर येणे अश्या अनेक आजाराची झपाट्याने लागण होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीवरही परिणाम जाणवू लागला आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. मोबाईल वरील गेम, समाज माध्यमांच्या अति वापराने विद्यार्थी हिंसक बनली आहेत. विदेशातील काही देशांप्रमाणे अमरावतीत एका विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये पिस्तूल आढळून आल्याची घटना नुकतीच गाजली आहे. आस्ट्रेलियासारख्या प्रगत देशाने विद्यार्थ्यांच्या सोशल समाज माध्यमांवर बंदी घालून संसदेत कायदा पारित केला आहे.

बोहरा समाजाने सुध्दा मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी यावी यासाठी सुधीर केने यांनी आमदार सुमीत वानखेडे तसेच मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. या पत्राची दखल घेत आमदार सुमीत वानखेडे हे येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडून नवोपक्रमाची दखल

शिक्षक सुधीर केने यांनी त्यांच्या शाळेतील इयत्ता पाच ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालून संशोधन केले. त्यात त्यांना विद्यार्थ्यांचा आळस कमी होऊन गुणवत्ता वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. या नवोपक्रमाची दखल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेत सुधीर केने यांना सन्मानित केले आहे.