अमरावती : गेल्‍या २६ ऑक्टोबरपासून मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळेत झालेल्या बदलाचे प्रवाशांनी स्वागत केले असतानाच सोमवारी अमरावती विमानतळावरील विमानसेवेला फटका बसला. बेलोरा येथील विमानतळावरून सकाळी ९.१५ वाजता होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. त्यातच विमान कंपनीकडून विमान रद्द करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात न आल्याने प्रवासी संतप्त झाले.

अमरावतीच्या विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमानसेवा रद्द करण्यात आल्याचे विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेच्या वेळेत बदल झाल्यानंतर विमानसेवा रद्द होण्याचा हा पहिलाच प्रसंग असला, तरी त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळेत गेल्या २६ ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे. ही विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली आहे. दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी ७.३० वाजता विमान मुंबईहून उड्डाण घेते आणि सकाळी ८.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहचते. त्यानंतर परतीचे विमान सकाळी ९.१५ वाजता मुंबईकडे झेपावते आणि सकाळी १०.३० वाजता मुंबई विमानतळावर पोहचते. ही विमानसेवा आधी संध्याकाळी होती. ही वेळ दिवसभराच्या कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोयीची असल्याने विमानाच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती, त्यामुळे विमान कंपनीने विमानसेवेच्या वेळेत बदल केला. त्याचे प्रवाशांनी स्वागत केले आणि या विमानसेवेला प्रतिसाद देखील मिळाला.

पण, आज सोमवारी सकाळी अमरावतीकडे निघालेले प्रवासी हे मुंबई विमानतळावर पोहचले, तेव्हा त्यांना अचानक विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी अमरावतीहून मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांनाही अगदी वेळेवर विमान रद्द झाल्याची सूचना मिळाल्याने गोंधळ उडाला.

सकाळी अमरावती विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे विमान उतरण्याची शक्यता नसल्याने मुंबईहून येणारे विमान रद्द करण्यात आले. विमान उशिरा आले असते, तर विमानाची इतर उड्डाणे रद्द करावी लागली असती, त्यामुळे अमरावतीकडे हे विमान झेपावलेच नाही. अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या गोंधळात अमरावतीच्या प्रवाशांना आल्या पावली विमानतळावरून परतावे लागले. विमान ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईतील कामांचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. अनेक प्रवाशांना आता मुंबईला पोहचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. रेल्वेचे तिकीट ऐनवेळी मिळणे शक्य नसल्याने खासगी वाहनातून प्रवास करण्याखेरीज त्यांना पर्याय उरलेला नाही.