विदर्भ राज्याची भूमिका चळवळीच्या माध्यमातून जोरकसपणे मांडणारे विदर्भवादी ज्येष्ठ नेते नानाभाऊ एंबडवार यांनी आणीबाणीच्या काळात काँग्रेससोबत जाऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी आणीबाणीत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना साथ देण्याचे समर्थन केले होते, हे येथे विशेष.
दोनदा आमदार राहिलेले आणि धोटे यांच्या खांद्याला खांदा लावून विदर्भाच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणारे नानाभाऊ एंबडवार सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.
राममनोहर लोहिया यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि जनसंघाला एकत्र आणले होते. देशात मोठी चळवळ उभी झाली होती. त्यादेशातील सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून इंदिरा गांधी यांची कोंडी केली होती. मुळे इंदिरा गांधी घाबरल्या आणि त्यांनी आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही विरोधात होतो. भाऊ (जांबुवंतराव धोटे) खासदार होते. त्यांनी इंदिरा गांधी यांचे राजकारण आणि त्यांच्या कामाचा आवाका बघितला होता.
देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता इंदिरा गांधी करू शकतात, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला १९७७ ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु अशाप्रकारे आणीबाणीला पाठिंबा देणे ही आमच्याकडून झालेली मोठी चूक होती, असे एंबडवार म्हणाले.
छोटी राज्य प्रशासन आणि विकासाच्या दृष्टीने योग्य आहेत. छत्तीसगडकडे बघितल्यास याचा प्रत्यय येईल. विदर्भ झाल्यास इतर राज्याप्रमाणे मुंबईतील उत्पन्नाचा काही वाटा विदर्भाला देखील मिळेल, असेही ते म्हणाले. विदर्भाच्या चळवळीला यवतमाळातून प्रारंभ केला आणि संपूर्ण विदर्भात त्याचे लोण परसले. काँग्रेससोबत गेल्याने चळवळीला धक्का बसला काय, असे विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसमध्ये जहागीरदारी होती. या पक्षातील सुभेदारांविरुद्ध बोलणाऱ्यांना टिकू दिले जात नव्हते. अशा वातावरणात आमच्या चळवळीने विदर्भातील सामान्य जनतेला बोलायला आणि लढायला शिकवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वेगळ्या विदर्भाची भूमिका घेतली आणि तसे वातावरण निर्मिती केल्याने विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता, मतदाराने भाजपला मतदान केले. विदर्भातील ९० टक्के जनता वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. परंतु या जनतेचा चळवळीवरील विश्वास उडाला आहे. लोकांचा विश्वास आम्ही गमावला आहे. त्यामुळे लोक आंदोलनात सहभागी होणार नाही.

मुख्यमंत्री कायम नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास करण्याची भाषा करू नये. ते कुणीही ऐकणार नाही. फडणवीस काही नेहमीसाठी मुख्यमंत्री राहणार नाहीत. सर्वच दृष्टीने विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. आकाराने छोटय़ा राज्यांचा विकास अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना झुंडवादी
शिवसेनेची मुंबई आणि औरंगाबाद येथे गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. शिवसेनेच्या अधिपत्याखालील या दोन शहरांतील रस्ते, मलनि:स्सारण व्यवस्था बघितल्या असता येथे काही कामे होतात की नाही, असा प्रश्न पडावा. मात्र पक्षाचे नगरसेवक कोटय़धीश दिसतील. शिवसेना म्हणजे नुसती झुंडशाही आहे, असेही ते म्हणाले.

मोदींसोबत निवडक उद्योजक का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार करीत नसतील तर ते काही निवडक उद्योजकांनाच घेऊन परदेश दौऱ्यावर का जातात, असा सवालही त्यांनी केला. गेल्या ६० वर्षांत देशात काहीच झाले नाही, या भाजपच्या वक्तव्याचा समाचार देखील त्यांनी घेतला. उपासमारीने लोक मरत असायचे आज अन्नधान्याची निर्यात होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने भरारी घेतली आहे. लोकशाही देश असून देखील ६० वर्षांत अतुलनीय विकास झाला. भाजपमधील कोणत्याही व्यक्तीचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नव्हता. इंग्रजाकडून सत्ता घेण्यास त्यांचा विरोध होता, असाही टोला त्यांनी हाणला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanabhau embadavara says it was my mistake i want with congress in the emergency