विद्यार्थ्यांनो, परीक्षेला सामोरे जाताना कुठलाही ताण मनावर ठेऊ नका. आजवर जो अभ्यास केला त्याचाच सराव करा. एकच प्रकरण घेऊन बसण्यापेक्षा सर्वांचा थोडाथोडा अभ्यास करा. परीक्षेच्या काळात सकस आहार आणि पुरेशी झोप घ्या. बिनधास्त परीक्षेला सामोरे जा. कुठलीही परीक्षा हे पुढील प्रवेशाचे केवळ माध्यम आहे. आयुष्यात करिअरच्या शेकडो संधी तुमची वाट बघत आहेत, असा मोलाचा सल्ला बालमेंदू विकास तज्ज्ञ व किशोरवयीन मुलांच्या समुपदेशक डॉ. मंजूषा गिरी व किशोरवयीन आरोग्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण डहाके यांनी दिला.‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता डॉ. गिरी आणि डॉ. डहाके यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी आणि पालकांनी कुठली काळजी घ्यावी आण तणावमुक्त परीक्षा कशा देता येतील यावर माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी!

डॉ. मंजूषा गिरी म्हणाल्या, करोनामुळे दोन वर्षे परीक्षाच झाल्या नाहीत. तसेच शिक्षणही पूर्णपणे ऑनलाईन झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन व लिहिण्याचा सरावही कमी झाला. पालकही विद्यार्थ्यांना त्यादिशेने मार्गदर्शन करण्यात काही प्रमाणात कमी पडले. आता बारावीची परीक्षा सुरू होत आहे, तर दहावीही परीक्षा पुढील महिन्यात सुरू होणार आहे. परीक्षेच्या दिवसापर्यंत एकच विषय घेऊन न बसता संपूर्ण अभ्यासक्रमाचा थोडाथोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दिवसांमध्ये वेगळा काही अभ्यास सुरू करण्याच्या भानगडीत न पडता सरावावर अधिक भर द्या. परीक्षा म्हटली तर वेळेचे नियोजन फार आवश्यक आहे. त्यासाठी तीन तासांमध्ये पेपर सोडवण्याचा सराव वारंवार करणे आवश्यक आहे. अनेकदा वेळेअभावी काही प्रश्नांची उत्तरे लिहिता न आल्याने ताण येतो. याचा परिणाम पुढील पेपरवर होतो. त्यामुळे वेळेचे नियोजन करा, असे आवाहनही डॉ. मंजूषा गिरी यांनी केले.

डॉ. डहाके म्हणाले, परीक्षेच्या काळात मुलांसह पालकांनी स्वत:ला शिस्त लावायला हवी. मुलांची प्रेमाणे विचारपूस करणे, त्यांना अधिकाधिक वेळ देणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात मुलगा अभ्यास करत असताना आपण मोबाईल हातात घेऊन बसणे फार चुकीचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा >>>गडचिरोली : जहाल नक्षलवादी दाम्पत्यास हैदराबाद येथून अटक; १७ वर्षांपासून होते फरार

अपेक्षेचे ओझे लादू नका

डॉ. गिरी म्हणाल्या, वाढत्या स्पर्धेमुळे पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वात आधी पालकांनी आपल्या मुलांची पात्रता व क्षमता न ओळखता अवाजवी अपेक्षा करणे सोडून द्यावे. पालक आपली प्रतिष्ठा जपण्यासाठीही अनेकदा मुलांवर अपेक्षा लादतात. त्यामुळे मुले फार तणावात जगतात. ही गोष्ट पालकांनी समजून घेणे फार आवश्यक आहे. आयुष्यात करिअरच्या अनेक संधी आहेत. जेईई आणि नीट म्हणजेच करिअर नाही. मुलांमधील कलागुणांना ओळखा. त्यातही अनेक संधी आहेत.

झालेल्या पेपरवर चर्चा नको
पेपर झाला की त्यातील चुकांवर चर्चा करण्याची आपल्याकडे एक सवय आहे. याचा परिणाम पुढील पेपरवर होतो. त्यामुळे पेपर झाला की त्यावर चर्चा न करता पुढील पेपरच्या अभ्यासावर लक्ष द्यायला हवे, असा सल्ला डॉ. डहाके यांनी दिला.

हेही वाचा >>>‘खासदार संजय राऊत पिसाळलेला **, मनोरुग्ण!’; आमदार संजय गायकवाड यांची जहरी टीका

हे प्रयोग करा…
जर काही वेळात मुलगा किंवा मुलगी अभ्यासाचा कंटाळा करत असेल तर याठिकाणी आईची भूमिका फार महत्त्वाची ठरते. परीक्षा आहे अभ्यास कर, कंटाळा करू नको असे दैनंदिन सल्ले देण्याऐवजी काही प्रयोग करून पाहू शकतो. जसे आपणही घरातले एखादे काम हातात घ्यावे. उदाहरणात भाजी तोडायला घेतली तर मुलाला हे पटवून द्या की जसे तू काम करतोस तसे मीही काम करताेच आहे. मग त्याच्याशी पैज लावा, माझी भाजी तोडून होईपर्यंत तू अभ्यास कर. यामुळे किमान तो तितका वेळ तरी कंटाळा करणार नाही. असे छोटे-मोठे प्रयोग केले तर मुले आपल्यासोबत अभ्यासात रमू शकतात. याशिवाय परीक्षेच्या दिवसात मुलांना सकस आहार आणि पुरेशी झोप देणेही आवश्यक असते. परीक्षा आहे म्हणून कमी झोप घेणे हा उपाय नाही. याकडे विद्यार्थी आणि पालकांनीही लक्ष द्यावे, असाही सल्ला डॉ. गिरी यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No exam stress hundreds of employment options available experts dr manjusha giri and dr praveen dahake dag 87 amy