अमरावती: देशभरात टोमॅटोंपाठोपाठ कांद्याच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्‍याचे परिणाम येत्‍या काही दिवसांत जाणवणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावतीच्‍या फळे व भाजीपाला बाजारात कांद्याचे दर आठवडाभरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले असून कांद्याचे सर्वसाधारण दर प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. किरकोळ बाजारात कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे.

यंदा फेब्रुवारी व मार्चमध्ये गारपिटीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चाळीत साठवलेला कांदाही ४० टक्के सडला आहे. उरलेल्या साठ टक्के मालातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसाबसा निघत होता. परंतु, आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्‍के शुल्‍क लादल्‍याने दरात घसरण होण्‍याची शक्‍यता आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे सध्याच्या दराप्रमाणे १ क्विंटल कांद्यामागे निर्यातदारांना १२०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. दरानुसार ही रक्कम कमी-अधिक होईल.

हेही वाचा… मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात दुप्पट वाढ!; सामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती

दक्षिण भारतात सलग २ वर्षांपासून अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान सुरू होते. तसेच यंदा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने कांद्याचे लागवड क्षेत्र ४० टक्के घटले आहे.

यंदा कांद्याचे उत्‍पादन घटले. त्‍यामुळे या कांद्याची बाजारात आवक मंदावली आहे. रविवारी अमरावतीच्‍या बाजारात केवळ ४२० क्विंटल कांद्याची आवक झाली. लहान कांद्याला ८०० रुपये तर चांगल्‍या दर्जाच्‍या कांद्याला ३ हजार ८०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २३०० रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आठवडाभरापुर्वी २१०० रुपये दर होता.

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला आहे. जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. साठवणुकीच्‍या कांद्याचा दर्जाही घसरला आहे. त्यामुळे बाजारात सध्या हलक्या प्रतिचा कांदा अधिक प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी उच्चतम प्रतिच्या कांद्याला उठाव असल्याने दरवाढ होत आहे.

हेही वाचा… तेलंगणा एक्सप्रेसच्या पँट्रीकारमधून धूर, काय घडले नेमके? जाणून घ्या

जिल्ह्यातील बागायत पट्ट्यात पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतातून कांद्याला सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. बहुतांश शेतकरी शेतातूनच कांदा विकत असल्यामुळे साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. साठवणूक करणारे शेतकरी साधारणत: पोळ्यापर्यंत कांद्याची साठवणूक करतात. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा होता त्यांना नाइलाजाने पैशाच्या गरजेपोटी कांदा विकावा लागला. अद्यापही मोजक्याच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे.

पुढील कालावधीतही नवीन कांद्याची आवक कमी राहणार असून कांद्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे अशी, माहिती व्यापारी शेख मकसूद यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion price increased by 200 per quintal in a week in amravati mma 73 dvr