नागपूर : संसदेचे संरक्षक हे लोकसभा अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांनीच नवीन संसदेचे उद्घाटन करावे. लोकसभा अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आम्ही पाठिंबा देऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. ओवैसी म्हणाले, लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचे संरक्षक आहेत. लोकसभेत अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे. पंतप्रधान हे संसदेतील कार्यकारी आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही कार्यक्रमातही सहभाग घेऊ. अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आकाश कोसळेल, असे पंतप्रधानांनी समजण्याचे कारण नाही. देशात लोकतंत्र आहे. त्यानुसार नागपुरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आलो आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: ५० ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे, शंभर वनकर्मचारी…अखेर वाघीण अडकलीच! सावली वन परिसरात घेतला होता चार जणांचा बळी

लोकसभेत नियमबाह्य ३७० कलम हटवण्याचा आम्ही विरोध केला होता. तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्याला समर्थन दिले. आज दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केंद्र सरकारने त्या विरोधात वटहुकूम आणला. या मुद्यावर केजरीवाल रडत बसले आहे. आता या मुद्यावर त्यांना सर्वोच्च न्यायालयात भांडत रहावे लागणार आहे. भारतीय संविधानानुसार विशिष्ट वयानुसार प्रत्येकाला लग्नाचा अधिकार आहे. कोणी कोणाशी लग्न करावे, हे कोण ठरवणार व रोखणार आहे? महाराष्ट्रात लव जिहादच्या नावावर भाजपा आणि संघाने आंदोलन केले. त्यातून द्वेष पसरवण्याचे काम केले. भाजपाचे लोक रोजगार, शेतकरी आत्महत्यांवर बोलत नाहीत. लव जिहादच्या नावावर मुस्लीम समुदायाविरोधात द्वेष पसरवण्याचा काम केले जात आहे, असेही ओवेसी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owaisi supports modi for inauguration of new parliament mnb 82 ssb