चंद्रपूर : चंद्रपूर शहरात राष्ट्रीय पक्षी मोरांची शिकार करून तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे मोरांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

चंद्रपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा तस्करीच्या फेऱ्यात अडकला आहे. शहरातील पठाणपुरा गेट बाहेर वेस्टर्न कोलफील्ड (वेकोली) परिसरातील माना टेकडी जवळ इरई नदीच्या काठावर तस्करांनी मोर पकडण्यासाठी नदीत एक किलोमीटर लांब जाळे लावले होते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून वन विभागाने जाळे जप्त केले. मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय – राष्ट्रीय पक्ष्याची जबाबदारी कोणाची?सामाजिक कार्यकर्ते अनुप चिवंडे आणि पक्षीप्रेमी मनोज बंडेवार यांनी ही बाब लक्षात येताच वन विभागाला कळवले. तात्काळ कारवाई करत वन कर्मचाऱ्यांनी जाळं जप्त केलं.

मोरांप्रती वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वेकोलीच्या माना टेकडी परिसरात फिरायला येणाऱ्या प्रत्येकाला सकाळी व संध्याकाळी मोर हा पक्षी दिसतो. या परिसरात मोर या पक्षाचे वास्तव्य आहे. सकाळच्या सुमारास तर हा पक्षी हमखास दिसतोच.

त्यामुळे या परिसरात मोराची शिकार करणारे शिकारी सक्रिय झाले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. माना टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल झाले आहे. झाडे बरीच वाढली आहेत. त्यामुळे जंगली प्राणी येथे वास्तव्याला आहेत. तसेच काहीना येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्या पाठोपाठ मोर देखील येथे आल्याने आता शिकारी या भागात सक्रिय झाले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

मुल तालुक्यातील मौजा आदर्श नगर (मारोडा) येथील गणपत बालाजी मानेवार (६०)यांना जंगलात गुरे चारत असताना त्याला वाघाने गंभीर जखमी केले. बालाजीला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने गुराखी यातून बचावला आहे. मात्र, त्याृला गंभीर जखमी झाल्या आहे. गुराखी मानेवार हा गावाजवळच्या जंगल परिसरात गुरे चरायला घेऊन गेला होता.

गुरे चारत असताना झुडुपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर झडप घातली. गुराख्याने वाघाच्या हल्ल्याचा प्रतिकार करीत असताना आरडाओरड केली. या आवाजाने गावाशेजारील नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. माहिती मिळताच क्षेत्र सहायक यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.